माजी आमदार लवू मामलेदार यांचा आरोप : त्यामुळेच उमेदवार, कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
प्रतिनिधी /पणजी
मगो पक्षाने अर्थात ढवळीकर बंधू प्रा. लि. कंपनीने कोणालाही विश्वासात न घेताच तृणमूल काँग्रेस पक्षाकडे युती केल्याचा आरोप माजी आमदार लवू मामलेदार यांनी केला असून त्याचा परिणाम म्हणून मगोचे उमेदवार, कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याची टीका त्यांनी केली.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मगोचे नेते म्हणवणारे उमेदवारांच्या नावाने मोठी रक्कम उकळतात आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मग ती जाते कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. मगो उमेदवारांना, कार्यकर्त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली असून त्याची फळे म्हणूनच उमेदवार मगो पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचा दावा मामलेदार यांनी केला आहे. स्वार्थी हेतूने मगोचे ढवळीकर बंधू काम करीत असून तृणमूल काँग्रेसबरोबर केलेली युती मगोला बरीच महागात पडणार आहे. उमेदवारी देतो म्हणून सांगून दोन्ही पक्षांनी चार ते पाच उमेदवार एकेका मतदारसंघात ठरवले असून प्रत्यक्षात मात्र एकालाच उमेदवारी मिळणार आहे. मग बाकीचे उमेदवार काय करणार? तर ते पक्ष सोडून जाणार असल्याचे मामलेदार म्हणाले.
तृणमूल काँग्रेस पक्षाने रु. 5000 गृहलक्ष्मी योजनेतून देण्याची घोषणा केली असून ती फसवी आहे. पं. बंगालमध्ये त्यांची 15 वर्षे सत्ता आहे. तेथे महिलांना रु. 500 देखील मिळत नाहीत मग येथे गोव्यात कसे देणार? असा प्रश्न करुन जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे मामलेदार म्हणाले.