वार्ताहर/ निपाणी
निपाणीसह परिसरात सर्वाधिक शेतकरी तंबाखू उत्पादन घेतात. तंबाखू तयार करून चाकीची कामे पूर्ण करून शेतकरी तंबाखू विक्रीच्या तयारीत होता. तोच शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे तंबाखू उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता. याविषयीचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध करून शेतकऱयांची व्यथा मांडली होती. याची दखल घेत मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी बुधवारी निपाणी नगरपालिका सभागृहात बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व बाबींचा विचार करून गुरुवारपासून तंबाखू सौद्यांना सुरुवात करण्याची परवानगी देण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात बैठक बोलविण्याचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी तंबाखू व्यापारी राजन व्हदडी म्हणाले, सध्या तंबाखू उत्पादक शेतकऱयांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे. महापुराच्या संकटातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच कोरोनाचे नवे संकट शेतकऱयांसाठी अडचणीत भर घालण्यास कारण ठरत आहे, असे सांगितले.
रमेश पै म्हणाले, 17 ते 18 मार्चपर्यंत काही प्रमाणात तंबाखू सौदे सुरू होते. पण लॉकडाऊननंतर सौदे पूर्णपणे बंद झाले आहेत. यातून शेतकरी अडचणीत आला आहेच. पण त्याचबरोबर तंबाखू वखारीत काम करणारे दिवाणजी, हमाल, कामगार यांची रोजंदारीदेखील थांबली आहे. या सर्वांसाठी तंबाखू सौदे व वाहतुकीला परवानगी द्यावी. धनंजय मानवी म्हणाले, तंबाखू सौद्यांना परवानगी देताना वखारीत येणाऱया तंबाखूवर प्रक्रिया करण्याच्या कामालाही परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
चंद्रकांत कोठीवाले म्हणाले, बिडी उत्पादकांना सध्या तंबाखूची गरज आहे. सौदे सुरू होताच बिडी उत्पादकांची सोय होणार आहे. प्रवीण शाह म्हणाले, केंद्र शासनाने तंबाखू उत्पादकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. निपाणी भागातील तंबाखू बिडीसाठी वापरला जातो. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने बिडी उत्पादनास मंजुरी द्यावी, असे सांगितले. शशिकांत शहा यांनीही आपले विचार मांडले. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी शेतकऱयांसमोर असणाऱया समस्या विशद केल्या.
खासदार आण्णासाहेब जेल्ले म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे बेळगाव जिल्हा रेडझोनमध्ये आहे. पण निपाणी तालुका मात्र सुरक्षित आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे. तंबाखू उत्पादक शेतकऱयांच्या अडचणी लक्षात घेऊन ही बैठक घेतली आहे. तंबाखू सौदे सुरू करावेत. तंबाखू प्रोसेसिंगचे कामही करावे. शेतकऱयांना तंबाखूचा भाव चांगला द्यावा. संकटकाळात शेतकऱयांना दिलासा द्यावा. या सर्व प्रक्रियेत कोरोना प्रतिबंधासाठी सामाजिक अंतर ठेवावे. सर्वांनी सुरक्षित रहावे, असे सांगितले.
उत्पादकांना चांगला दर द्यावा
मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, परमेश्वराच्या कृपेने निपाणी मतदारसंघात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. प्रशासनाने केलेल्या तत्पर कार्यवाहीचे हे फलित आहे. निपाणीसह ग्रामीण भागात तंबाखू उत्पादक शेतकऱयांपुढे तंबाख विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. व्यापाऱयांनी चांगला दर देऊन तंबाखू खरेदी करावी. तंबाखू वखारीत काम करणाऱया महिला व हमालांना लवकरच पास देण्याची सोय केली जाईल. जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा करून आंतरराज्य तंबाखू वाहतुकीलाही परवानगी देऊ, असे सांगितले.
यावेळी सीपीआय संतोष सत्यनायक, अमित साळवे, भरत चव्हाण, पुष्कर तारळे, इरफान महात, हरिषचंद्र शांडगे, आकाश शेट्टी, सुभाष शाह, अजित कुरबेट्टी, विनोद देशमाने, प्रकाश तारळे आदी तंबाखू व्यापारी उपस्थित होते.