केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन, बेती येथे ‘श्री स्वामी समर्थ मंदिर’ कोनशीला समारंभ
प्रतिनिधी /पर्वरी
गोवा ही पुण्यभूमी आहे. या भूमीवर अनेक आक्रमकांनी अत्याचार केले, येथील देवळे उद्वस्त केली, पण आपल्या पूर्वजांनी त्यांना न डगमगता आपली संस्कृती, देवळे आबादित ठेवली आहेत. आजचा तरुण पश्चात संकृतीच्या नादाला लागल्याने आपल्या संस्कृतीची नाळ तोडू पाहत आहे. त्याला पुन्हा अध्यात्माशी जोडण्यासाठी मठ, मंदिरे निर्माण होणे ही काळाची गरज आहे. आज पर्वरी परिसरात श्री श्री महंत गावडेकाका महाराजांच्या प्रेरणेने श्री स्वामींचे भव्य मंदिर उभे राहत आहे. हे आमचे मोठे भाग्य आहे, असे उद्गार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.
बेती येथे ‘श्री स्वामी समर्थ मंदिर’ कोनशीला समारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज, आमदार रोहन खंवटे,आमदार केदार नाईक,उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर,पेन्ह दि फ्रा?क सरपंच स्वप्नील चोडणकर,साई मंदिर अध्यक्ष उल्हास मोरजकर,निलेश वेर्णेकर उपस्थित होते.
आजचा तरुण वर्ग जर अध्यात्माशी जोडायचा असेल तर अध्यात्माला विज्ञानाची जोड द्यायला पाहिजे.केवळ कर्मकांड करत बसण्यास काहीच अर्थ नाही.आजच्या तरुणांत प्रचंड उत्साह,बुद्धी ,शक्ती आहे.त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.त्यांच्या शक्तीला योग्य दिशा दिली तर देशाची खऱया अर्थाने प्रगती होईल.त्यासाठी मठ ,मंदिरे निर्माण होण्याची नितांत गरज आहे.असे उद्गार श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज यांनी काढले. आमदार रोहन खंवटे आणि केदार नाईक यांनी आपल्या भाषणातून या मंदिर उभारणीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सुरवातीला गावडे काका महाराज आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कोनशीला समारंभ संपन्न झाला.तसेच मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले.