फिरायला गेल्यावर काळजी गरजेची
प्रतिनिधी/ सातारा
सेल्फी म्हणजे आता प्रत्येकांच्या आयुष्याचा दैनंदिन भाग बनला आहे. आता सेल्फी काढणं चांगलं की वाईट याबद्दल कुणी ठाम असं सांगू शकत नाही. पण ही सेल्फी धोकादायक ठरू शकते एवढं नक्की. अशीच सेल्फी घेणारा साताऱयातील यादोगोपाळ पेठेतील पुष्कर जागळे हा कास पठाराकडे फिरायला गेला असता गणेशखिंड परिसरातील दरीत पडला. त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पर्यटक आणि खास करून तरूण पर्यटक चांगल्या सेल्फीसाठी कोणत्याही थराला जातात. यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे पर्यटनस्थळी निर्बंध लागू आहेत. तरीही पर्यटक सगळे नियम मोडण्यात पुढाकार घेत असल्याचे नेहमीच बघायला मिळतात. यात योदोगोपाळ पेठेतील पुष्कर जांगळे हा युवक त्यांच्या दुचाकीवरून कास पठार भागात फिरणाऱयासाठी गेला होता. गणेशखिंड येथे गेल्यानंतर त्याला सेल्फी काढण्याचा मोह झाला. त्याने रस्त्यावर दुचाकी लावली. चालत जाऊन सेल्फी पाँईटवर उभा राहून सेल्फी काढत असताना पाय घसरून पडला. ही बाब काही नागरिकांनी पाहिली असता त्यांनी तालुका पोलीसांना यांची माहिती दिली. तालुका पोलीस व शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्स यांनी या युवकाला बाहेर काढले. ही घटना घडताच सगळीकडे पुन्हा सेल्फी धोकादायक असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे सेल्फी काढणं खरचं इतकं गरजेचं आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सेल्फी काढताना आपल्या जीवाची काळजी न घेणं किती धोकादायक असू शकतं हे अशा घटनांमधून सिद्ध होत असतानाही लोक मात्र जागृत होताना दिसत नाहीत. सेल्फी काढल्यावर त्याला लगेचच सोशल मीडियावर अपलोड करणे. त्यानंतर त्याला मिळणारे लाईक्स या शर्यतीत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र तरूण वर्ग भान हरवून सेल्फीसाठी जीवधोक्यात घालतच आहे.