प्रतिनिधी /पणजी
वारंवार होणाऱया पक्षांतरांना प्रोत्साहन मिळत राहिल्यास भविष्यात कोणताही भांडवलदार राजकीय पक्ष स्थापन करेल व निवडणूक न लढवता आमदारांना विकत घेउन गोव्यावर ताबा मिळवेल, अशी भीती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली आहे.
रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस सोडून गेलेल्या दहा आमदारांना अभय मिळाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्याची उत्तरे सर्वोच्च न्यायालय वा संसदेला द्यावी लागतील, असे चोडणकर पुढे म्हणाले. पत्रकार परिषदेस युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जॉन नाझारेथ, सोशल मीडियाचे हिमांशू तिवरेकर यांची उपस्थिती होती.
लोकांनी धर्मनिरपेक्ष विचारधारेला मतदान केले होते. परंतु नंतर हे आमदार विरोधी विचारधारा असलेल्या पक्षात सामील झाले. हे असेच चालू राहिल्यास पक्षांतरास प्रोत्साहन मिळेल व खुलेआम पक्षांतरे होत राहतील. त्यामुळे अशा पक्षांतरांविरुद्ध आम्ही लढा देत राहू. कारण हा केवळ गोव्याचाच नव्हे तर आपल्या देशाच्या लोकशाही जडणघडणीशी संबंधित विषय आहे. काँग्रेस पक्ष देशात कधीही चुकीचे प्राधान्य प्रस्थापित होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी पक्ष तृणमूलमध्ये विलीन केला आणि 2017 च्या निवडणुकीत प्रत्यक्ष भाग न घेता तृणमूलने आमदार मिळविला. त्याच धर्तीवर भविष्यात ’अदानी’, ’अंबानी’ हे स्वतःचे पक्ष स्थापन करतील व निवडणूक न लढवता दोन तृतीयांश आमदार विकत घेतील आणि सभापतींना सांगतील की, ते त्यांच्या पक्षात विलीन झाले आहेत. त्यानंतर ते संपूर्ण गोव्याचे कोळसा केंद्रात रूपांतर करतील. तरीही त्यांना तसे करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही.’’ असा दावा चोडणकर यांनी केला.
पक्ष विलिनीकरणाचा अधिकार निवडणूक आयोगाचा
दरम्यान, राजकीय पक्षांचे विलीनीकरण करणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. कोणत्याही विधानसभेच्या सभापतीला तसा अधिकार नाही. आपले म्हणणे खोटे असल्यास सभापतींनी ते सिद्ध करावे, असे आव्हान चोडणकर यांनी दिले.
यापुर्वी चर्चिल आलेमाव व आलेक्स लॉरेन्स यांनी सेव्ह गोवा पार्टीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केल्यावर हीच प्रक्रिया स्वीकारण्यात आली होती. विलिनीकरणासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला होता व आयोगाने पक्षाच्या इतर सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय दिला होता, अशी माहिती चोडणकर यांनी दिली.
विविध गट समित्या बरखास्त
प्रदेश काँग्रेस समितीने राज्यातील विविध मतदारसंघांच्या गट समित्या बरखास्त केल्या आहेत. मये, थिवी, प्रियोळ, शिरोडा, वास्को, बाणावली आणि वेळ्ळी या गट समित्यांचा त्यात समावेश आहे. संबंधित मतदारसंघातील सक्रिय कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून लवकरच सदर समित्यांची पूनःस्थापन करण्यात येणार आहे, असे प्रदेश समितीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी कळविले आहे.