ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत ठाकरे कुटुंबाचे अलिबागमधील 19 बंगले दाखविण्याचे आव्हान किरीट सोमय्या यांना दिले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील आरोपांसंबंधी बोलताना ते सिद्ध करा, अन्यथा जोड्य़ाने मारेन असेही राऊत यांनी म्हटले होते. त्याला किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
सोमय्या म्हणाले, अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरेंमध्ये जमिनीचा व्यवहार झाला होता. आता अलिबागमध्ये वनखात्याच्या जमिनीवर घरं बांधण्यात आली आहेत. 19 बंगले कोणाच्या नावावर आहेत? रश्मी उद्धव ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला या 19 बंगल्यांचा मालमत्ता कर कोलराई ग्रामपंचायतला भरला. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे यांनी आधीच्या दोन वर्षांचा मालमत्ता कर भरला असून त्याआधीच्या सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईकच्या नावे आहे. बंगले ठाकरेंचे नाहीत. तर मग ते कर का भरत आहेत, याचं उत्तर मला ठाकरेंनी द्यावं.
उद्धव ठाकरेंवरील खुन्नस काढायची आहे, म्हणून राऊत माझा वापर करत आहेत. जोडय़ाने मारण्याची भाषा ते रश्मी ठाकरेंना संबोधून बोलत आहेत. किरीट सोमय्यांना जोडय़ाने मारणार असाल तर मारा, माझ्याच जोडय़ाने मारा. मी तयार आहे! मी माझी चप्पल संजय राऊत यांच्या हातात द्यायला तयार आहे. फक्त राऊत यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडून मी सादर केलेले पुरावे खोटे असल्याचं सांगावं, असेही सोमय्या म्हणाले.