निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द परिसरात जोरदार पाऊस : कडधान्य सुगीत व्यत्यय, पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान
वार्ताहर / सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास मेघ गर्जनेसह दमदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे कडधान्य पिकाचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात बदल निर्माण झाला होता. दुपारी चार नंतर पावसाला सुरुवात झाली. बघता बघता पावसाने रुद्रावतार धारण केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. या पावसामुळे सांबरा येथील गटारीतील घाण रस्त्यावरून वाहू लागली. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. अचानक आलेल्या पावसामुळे कडधान्य पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सांबरा परिसरात सध्या मसूर, वाटाणा, हरभरा, मोहरी आदी अडधान्य पिके काढण्याचे काम सुरू आहे. अनेकांनी ही पिके काढून शेतवाडीत ठेवली आहेत. या पावसामुळे कडधान्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच पावसामुळे गुऱहाळ घरांचेही मोठे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. हा पाऊस निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द परिसरात मोठय़ा प्रमाणावर झाला तर अन्य गावांमध्ये तुरळक स्वरुपाचा पाऊस झाल्याचे समजते.
काजू पिकाला पोषक
कुद्रेमनी : गुरुवारी पडलेला अवकाळी पाऊस काजू पिकासाठी फायदेशीर ठरला तरी यंदा काजू लागवडीचे प्रमाण कसे असणार या विवंचनेत काजू बागायतदार दिसून येत आहेत. या भागात मोठय़ा काजू बागा आहेत. काजू झाडांना मोहरण्यास यंदा प्रारंभ झाला असून गेल्या आठवडय़ात सकाळी धुके पडण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे झाडावरचा मोहोर जळून गेला. त्यामुळे काजू लागवड अधिक होण्याची अपेक्षा फोल ठरली. गुरुवारी दुपारी व रात्री गडगडाटासह दमदार पाऊस पडला. हा पाऊस झाडे मोहरण्यास पोषक ठरेल की नाही याची चिंता मात्र छोटय़ा-मोठय़ा काजू बागायतदारांतून व्यक्त होत आहे. या भागातील ऊस, मिरची, कोबीसारख्या पिकांना हा पाऊस फायदेशीर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सुळगे (ये.) परिसरात शेतकऱयांची तारांबळ
येळ्ळूर : सुळगे (ये.) परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्य सुगीत व्यत्यय निर्माण झाला. दुपारी पावणेचारच्या सुमारास विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतात काढून ठेवलेली कडधान्य पिके दास्तान करण्याची धावपळ सुरू झाली. पावसात कडधान्ये भिजू नयेत म्हणून ती दास्तान करून झाकून ठेवण्यासाठी एकच धांदल उडाली. मसूर, वाटाणा, मूग, हरभरा, मोहरी आदी कडधान्य पिके शेतात वाळविण्यासाठी ठेवण्यात आली होती. काढून ठेवलेली कडधान्य पिके काही प्रमाणात भिजली आहेत. ती खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हुरडय़ाला आलेल्या जोंधळ्याच्या कणसातून पाणी अधिक काळ साचल्यास बुरशी चढून जोंधळा खराब होतो. पावसाने आवरते घेतल्याने सध्या तरी शेतकऱयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पाऊस पडल्याने जोंधळ्याला अधिक मुळे सुटतात. यामुळे कडबी काढताना शेतकऱयांना त्रास होणार आहे.
कडोलीत पावसामुळे कडधान्य पिकाचे नुकसान
कडोलीः विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कडोली परिसरातील कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून कडोली परिसरात हरभरा, मसूर, वाटाणा आदी कडधान्य पिके काढण्याची कामे जोरात सुरू झाली आहेत. ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱयांची तारांबळ उडाली आहे. कडधान्य पिके शिवारात पावसात सापडली आहेत. त्यामुळे कडधान्य खराब होऊन मोठे नुकसान होणार आहे.