बेळगाव : ताशिलदार गल्ली-कपिलेश्वर रोड कॉर्नरवर 15 दिवसांपासून गळतीद्वारे पाणी वाया जात होते. या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच याची दखल घेऊन जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात आले.
शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अशातच ताशिलदार गल्ली कॉर्नरवर जलवाहिनीला गळती लागून पाणी वाया जात होते. गेल्या पंधरा दिवसांपासून दुरुस्तीबाबत तक्रारी करूनही एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले होते. दररोज शेकडो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना सुरळीत पाणी मिळणे मुश्कील बनले होते. ताशिलदार गल्ली येथील जलवाहिनीची दुरुस्ती करून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून अधिकाऱयांचे लक्ष वेधले. याची दखल घेऊन जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. सदर काम पूर्ण केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.