धरणाची सुरक्षितता दर्शविणारी पिझोमीटर यंत्रणाच बंद अधिकाऱयांकडून वरिष्ठांची दिशाभूल
भूकंपमापन केंद्र आठ वर्षांपासून बंद
निरीक्षण क्रमांक तीनच्या इमारतीला गळती
दोन वर्षांपूर्वीच दुरुस्तीसाठी कोटय़वधी रु. खर्च
गणपत डांगी / साटेली-भेडशी:
तिलारी धरण प्रकल्पाच्या महत्त्वाचा विभागाच्या इमारतीची तसेच आतील बसविण्यात आलेल्या सर्व महत्वाच्या यंत्रणांची मोठी दुरवस्था झाली आहे. या विभागाचे जबाबदार अधिकारी वरिष्ठ अधिकाऱयांना याबाबत चुकीची माहिती देत डोळय़ात धूळफेक करीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्य तिलारी धरणाचे हृदय असे संबोधले जाणारी पिझोमीटर यंत्रणाच मागील काही वर्षांपासून बंद आहे. बंद पिझोमीटरमुळे धरण असुरक्षित झाले आहे.
मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिक यांच्याकडून प्राप्त झालेल्या मुख्य माती धरणामध्ये साखळी क्रमांक चारशे मी. व साखळी क्र. 950 मी. काटछेदात ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. तिलारी मुख्य माती धरणात साखळी क्रमांक नऊशे पन्नास मीटरवर बसविण्यात आलेल्या निरनिराळय़ा उपकरणांचे निरीक्षण कक्ष क्रमांक एक व दोनद्वारे करण्यात येते. साखळी क्रमांक चारशे सत्तर मीटरवरील उपकरणांसाठी निरीक्षण कक्ष क्रमांक तीनमधून करण्यात येते. सध्या या तीनही इमारतींची दूरवस्था झाली असून गेल्या दोन वर्षापूर्वी या कामावर काम न करता कोटय़ावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. धरणाच्या पाया बांधकामांमध्ये आणि माती भरावमध्ये असे मिळून जवळपास वेगवेगळय़ा प्रकारचे शंभरहून अधिक पिझोमीटर बसविण्यात आले आहेत. सर्व उपकरणांच्या नियतकालिक नोंदी घेऊन त्यापुढील विश्लेषणासाठी महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक (मेरी नाशिक) येथे पाठविण्यात येत होत्या. 2010 मध्ये हे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर पुढील दोन वर्षे यंत्रणा व्यवस्थित चालली. पुढे मात्र या अधिकाऱयांच्या दुर्लक्षपणामुळे यंत्रणाच बंद झाली असून आजपर्यंत ती बंदच आहे. अप्रत्यक्षपणे पूर्वीच्या नोंदी दाखवून नोंदी थोडय़ाशा बदलून त्याच नोंदी नाशिक येथे पाठविण्यात येत होत्या. याबाबत पुढे अशी धक्कादायक माहिती कळते की या कामासाठी नियुक्त केलेले बेळगावचे तज्ञ अधिकाऱयांची बदली झाल्यानंतर उपकरणांच्या नोंदी ठेवण्याचे काम सेवानिवृत्तीपर्यंत ते स्वतः पाहत होते. इतका त्यांना त्यामध्ये हातखंडा होता. तसेच या सर्व उपकरणांच्या नोंदी घेण्याकरिता, इमारतीच्या स्वच्छता व सुरक्षेकरिता काही व्यक्तींची मनुष्यबळ ठेकाद्वारे नेमणूक करण्यात आली होती. अशा अदृश्यपणे काम करणाऱया ठेकेदारांची प्रत्यक्ष मनुष्यबळ यंत्रणा केव्हा दिसून आली नाही. साधारणत: हा ठेका रुपये पंचवीस लक्ष रुपयांचा होता, असे समजते. 2019 च्या महापुराच्या काळातील कोणत्याही नोंदी या उपकरणावर नोंदविण्यात आल्या नाहीत, याची माहिती घेण्यासाठी गेले असता हा सर्व प्रकार उघड झाला.
इमारतीच्या स्लॅबला गळती
मुख्य धरणाच्या अनुप्रवाह बाजूस सूक्ष्म भूकंपमापन केंद्र बांधण्यात आले असून सध्या ही भूकंपमापन केंद्र गेली आठ वर्षे पूर्णपणे बंद आहे. याही इमारतीची मोठी दूरवस्था झाली असून या इमारतीच्या स्लॅबच्या गळतीने आत पाणी भरत असते. या इमारतीवरही दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला असून प्रत्यक्षात मात्र इमारत पाहिली असता कोणताही खर्च करण्यात आला नाही, हे लक्षात येते. तसेच त्यामध्ये असणारे सर्व महत्त्वाची यंत्रणा बंद आहे.
निरीक्षणे नोंदविणारी यंत्रणा ठप्प
निरीक्षण कक्ष क्र. तीन ही इमारत पूर्णपणे सडली असून इमारतीत गळती सुरू आहे. या इमारतीच्या खोल्यांमध्ये असणारी सर्व उपकरणे अस्ताव्यस्त पडली असून त्यांच्या मुख्य धरणातून आलेले छोटे पाईप्स तुटलेले आहेत. गेली दोन वर्षे कोणीही कर्मचारी आल्याचे दिसून येत नाही. झाडे झुडुपांनी इमारतीला वेढले आहे. त्यावरून सर्व स्थिती पाहिली असता पिझोमीटरची निरीक्षणे नोंदविणारी यंत्रणा ठप्प आहे.
तिलारी प्रकल्पाच्या उपकरणाच्या दुरुस्तीकरिता दोन वर्षांपूर्वी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. हा निधी कुठे खर्च केला की फक्त कागदोपत्री घोडे नाचवले. की हा निधी हडप केला या प्रश्नांचे उत्तर मिळण्यासाठी याची सखोल चौकशी करून यात दोषी अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दुरुस्तीत कोटय़वधीचा भ्रष्टाचार-गोपाळ गवस
तिलारी मुख्य धरणातील महत्वाच्या उपकरणातील पिजोमीटर हे धरणाचे हृदय समजले जाते. यावरून धरणातील किती पाणी मातीत मुरले आहे, हे समजते. आहे. यावरून धरणाची सुरक्षितता पाहिली जाते. मागील काही वर्षापासून या महत्त्वाच्या नोंदी घेणारी उपकरणे बंद असून मोठी दूरवस्था झालेली आहे. मात्र, कोटय़वधी रुपयांचे दुरुस्तीचे काम फक्त कागदोपत्री घोडे नाचवून कोणत्याही
प्रकारचे काम न करता परस्पर जबाबदार अधिकारी आणि कामाचा ठेका घेतलेले ठेकेदार यांनी सातत्याने निधी उचललेला आहे. भविष्यात धरणासह या परिसराला धोका असून याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे लक्ष वेधून याची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हा संघटक गोपाळ गवस यांनी सांगितले.
पिझोमीटरमुळे धरणाची सुरक्षितता मोजली जाते
पिझोमीटर हे उपकरण माती धरणामध्ये काम सुरू असताना धरणाच्या पायामध्ये, माती भरावामध्ये बसविली जातात. पावसाळय़ामध्ये मातीच्या धरणामध्ये पाणी किती आत मुरले आहे, हे दर्शवते. त्यावरून आलेख काढला जातो. धरणामध्ये पाझरून आलेले पाणी ज्याला सिपेज म्हटले जाते, ते किती आहे ते पाहिले जाते व वाळूच्या गाळणी साच्यातून बाहेर काढले जाते. पिझोमीटरमुळे धरणाची सुरक्षितता तपासली जाते. यामुळेच त्याला धरणाचे ह्य्दय समजले जाते.