रेडझोनमध्ये गेलेल्या कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हय़ात दुसरी लाट ओसरत आहे म्हणून निर्धास्त राहिल्यास तिसरी लाट थोपविणे अवघड होऊ शकते.
कोरोनाची दुसरी लाट राज्यातील इतर जिल्हय़ात ओसरलेली असताना कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्हीचा दर व मृत्यूदर राज्यात सर्वाधिक राहिल्याने दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये गेले. त्यानंतर गेल्या महिनाभरात रेडझोनमधून बाहेर पडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले त्याकरिता कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढविण्यात आले. सिंधुदुर्गात दररोज दीड-दोन हजारापर्यंत चाचण्या होत होत्या. त्या आता 5-6 हजारापर्यंत वाढविण्यात आल्या. त्यामुळे सिंधुदुर्गात त्याचा चांगला परिणाम होऊन पॉझिटिव्हीटी दर कमी झालेला आहे. रेडझोनमध्ये जिल्हा गेला तेव्हा पॉझिटिव्हीटी दर 31 टक्क्यांपर्यंत गेला होता तो आता दहा टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्या टप्प्यातून तिसऱया टप्प्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात दररोज कोरोना चाचण्यांचे प्रमाण दहा हजारापर्यंत करण्याचे ठरविण्यात आले. परंतु अजूनपर्यंत दहा हजार चाचण्या दररोज करणे शक्य झालेले नाही. परंतु कोरोना रुग्णाचे प्रमाण थोडय़ा फार प्रमाणात कमी होऊ लागले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हाही लवकरच चौथ्या टप्प्यातून तिसऱया टप्प्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही जिल्हय़ात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे हे स्पष्टच होत आहे. परंतु कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली तरी ही लाट पूर्णपणे ओसरलेली नाही. नागरिकांनी बेफिकीरपणा दाखविल्यास कोरोना पुन्हा डोके वर काढून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे कोविडच्या नियमांचे पालन करायलाच हवे.वरिष्ठ अधिकाऱयांनी अशा प्रकारे दुसऱया लाटेबाबत स्पष्टता केली असली तरी सावधानता बाळगायलाच हवी. सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्या टप्प्यातून तिसऱया टप्प्यात गेला. त्यामुळे सर्वच दुकाने खुली झाली आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत दुकाने खुली करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता सर्वच बाजारपेठांमधून गर्दी व्हायला लागली आहे. अशावेळी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात धुणे या त्रिसूत्री नियमांचा अंमल करायलाच हवा. दुसरी लाट ओसरु लागली असे म्हटले जात असतानाच ‘कोरोनाने मृत्यू’ होण्याचे प्रमाण फारसे घटलेले नाहीत, ते रोखण्याचे मात्र आव्हान आहे. दोन्ही जिल्हय़ात मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. कोरोनाने मृत्यू होणाऱया रुग्णांचे डेथ ऑडिट केल्यानंतर अनेक कारणे पुढे आली. यामध्ये प्रामुख्याने कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी उशिरा दाखल होणे, विविध व्याधीनी त्रस्त असल्यामुळे, वयोवृद्ध अशी अनेक कारणे देण्यात आली. परंतु या काळातही फिजिशियनसारखा एकही तज्ञ डॉक्टर नाही ही शोकांतिका आहे. दोन्ही जिल्हय़ात जिल्हा रुग्णालयांचा कारभार प्रभारींच्याच हाती आहे. त्यामुळे दोन्ही जिल्हय़ाचे आरोग्य रामभरोसेच म्हणावे लागेल. गेल्या अडीच महिन्यात प्रचंड प्रमाणात रुग्ण वाढले आणि मृत्यूही झाले. त्यानंतर जाग आल्यानंतर सिंधुदुर्गात पुणे येथून चार फिजिशियन डॉक्टर दाखल झाले आहेत तेही पंधरा दिवसासाठीच. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरेल परंतु तिसरी लाट येईल तेव्हा काय करणार असा प्रश्न पडतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी कायमस्वरुपी फिजिशियन डॉक्टर देणे, सर्व रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. तरच आगामी कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात यश येईल.
आजची परिस्थिती पाहिली तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37,936 एवढी असून 952 जणांचा मृत्यू झालेला आहे. रत्नागिरी जिल्हय़ात आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या 48,731 एवढी झाली असून 1,649 जणांचे मृत्यू झालेले आहेत. कोकणात आजही आरोग्य सुविधा सक्षम नाहीत. व्हेंटीलेटर, ऑक्सिजन याची कमतरता होती ती आता दुसऱया लाटेत भरून निघाली. दोन्ही जिल्हे ऑक्सिजन पुरवठय़ाच्याबाबतीत स्वयंपूर्ण झाले आहेत. मात्र रिक्त पदामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण असल्याने पूर्ण कार्यक्षमतेने काम करता येत नाही. तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. या उणिवा आतातरी कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी भरून काढल्या पाहिजेत. कोरोनाच्या तिसऱया लाटेला सामोरे जाण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ात 50 बेडचे कोव्हिड सेंटर लहान मुलांसाठी तयार केले आहे तर रत्नागिरी जिल्हय़ात 173 बेडची तीन कोव्हिड सेंटर लहान मुलांसाठी तयार केली आहेत. तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी केलेली पूर्वतयारी समाधानकारक आहे. परंतु या ठिकाणीही तिसऱया लाटेचा सामना करताना तज्ञ डॉक्टरांची नितांत गरज लागणार आहे. बालरोगतज्ञ डॉक्टर हवेत, तरच लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यात यश येईल.
संदीप गावडे