पश्चिम बंगाल पत्रकाराच्या ट्विटला आपच्या आतिशी यांचे प्रत्युत्तर
प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पार्टी तृणमूल काँग्रेससोबत कदापी युती करणार नाही, असे स्पष्ट मत आपच्या गोवा प्रभारी आतिशी यांनी रविवारी व्यक्त केले आहे. आप राज्यात नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.
मीडिया रिपोर्टचा हवाला देताना पश्चिम बंगाल-आधारित पत्रकाराने, आप गोव्यात टीएमसी सोबत युती करण्याचा विचार करत आहे, असे ट्विट केले होते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने या प्रस्तावावर अद्याप निर्णय घेतलेला नाही, परंतु दोन्ही बाजूंनी या विषयावर चर्चा झाली आहे असेही त्या पत्रकाराने ट्विटमध्ये पुढे म्हटले होते. त्या ट्विटला प्रतिसाद देताना अतिशी यांनी सदर मत व्यक्त केले आहे.
‘मी पूर्ण जबाबदारीने सांगते की आप टीएमसीसोबत युती करणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. चांगल्या उमेदवारांसह गोव्याला नवीन पर्याय देण्याचा आणि एक प्रामाणिक व भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करण्याचा आमचा निर्धार आहे’, असे आतिशी यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यातील राजकारण खूपच बिघडले आहे. राजकीय नेते पक्ष बदलत असल्याच्या बातम्या रोज येत आहेत. कधी एखादा नेता पक्ष सोडून दुसऱया पक्षात जातो. कधी एखादा पक्ष दुसऱया पक्षाशी युती करतो. कधी एखादा पक्ष विरोधात उभा राहतो आणि विशिष्ट पक्षाच्या विरोधात प्रचार करतो. आणि त्याच पक्षासोबत सरकार बनवतो, असे प्रकार रोज घडत आहेत, असे आतिशी पुढे म्हटले आहे.
गोव्यातील नेते आजपर्यंत स्वयंविकासाचा विचार करत आले आहेत. ते फक्त भ्रष्टाचारातून स्वतःला कसे समृद्ध करायचे याचाच विचार करतात. राज्याच्या विकासाचा विचार राजकारण्यानी कधीच केला नाही. त्यामुळेच गोव्याचे राजकारण बदलण्याचा ’आप’चा निर्धार आहे आणि आप राज्यात प्रामाणिक सरकार देणारा एकमेव पक्ष ठरणार आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.
शिक्षणाचा दर्जा सुधारणे, पाणीपुरवठा अखंडित करणे, स्थानिकांना रोजगार देणे यावर बोलणारा एकही नेता नाही. हे सर्व घाणेरडे आणि कुरूप राजकारण आहे. त्यामुळे गोमंतकीय मेटाकुटीस आले आहेत. दुसरीकडे आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत गोव्याला पाच हमी दिल्या आहेत आणि गोव्याच्या विकासाची ब्लू पिंट घेऊन ते गोव्यात आले आहेत.