अध्याय अकरावा
भगवंत म्हणाले, मोठमोठे शिकलेले विद्वान, पंडित, वेद शास्त्र संपन्न इत्यादि बिरुदे मिरवणारे, आत्मज्ञान म्हणजे काय यावर तास न् तास बोलणारे कितीतरी मिळतील पण त्यापैकी आत्मतत्त्व समजून घेणारे फार थोडे! लाखात एखादाच त्यासाठी प्रयत्न करणारा असतो. त्याला सोडलं तर इतरांचा मनुष्यजन्म वाया गेला असंच म्हणावं लागतं. इतर योनीत जन्म घेऊन जे मिळवणं शक्मय नाही ते प्रयत्न करून मिळवण्यासाठी मनुष्य जन्म आहे हे विद्वान मंडळी शास्त्राभ्यास करून शिकतात पण धन आणि मान यांच्या अभिलाषेने ईश्वराचे आत्मतत्त्व जाणून घेण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. विद्वान लोकांच्याबद्दल एवढं सांगून झाल्यावर पुढं भगवंत म्हणाले, मनुष्य दुःखामागून दुःखे का भोगत असतो त्याची कारणे मी तुला सांगतो.
ज्याचा देह ‘पराधीन’ असतो तो जिवंतपणी अत्यंत केविलवाणा बनतो. पराधीनाला कल्पांतीसुद्धा समाधान प्राप्त व्हावयाचे नाही. दृश्य जगापेक्षा आपण वेगळे आहोत हे लक्षात न घेता जो स्वतःला दृश्य जगाचाच भाग समजतो व मायेच्या आधीन होतो म्हणजे पराधीन होतो. तो कधी स्वप्नातसुद्धा सुखी होत नाही. ‘पर’ म्हणजे माया, तिच्या जो स्वाधीन झाला, त्याला सुखाचे स्वप्नसुद्धा कधी पडत नाही. तो सदासर्वकाल अत्यंत दुःखातच असतो हे लक्षात ठेव.
गृहातील व्यवस्था नीट ठेवायची हे गृहिणीचे काम असते. पण तीच स्त्री जर पुरुषाला अनुकूल नसली, तर तिच्यामुळे त्याला दुःख होते. एखाद्याला कुपुत्र असतो. त्याच्यापासून आईबापांना रात्रंदिवस दुःखच प्राप्त होते. अशा कुपुत्रांची आवड काय ती बायकोवर आणि द्रव्यावर. आईबापांना ठकविणे आणि सात्त्विक लोकांना नाडणे हाच त्यांचा धंदा होय. ते स्वतः तर नरकात जातातच परंतु पूर्वजांनासुद्धा तेथे घेऊन जातात! अशा कुपुत्रांचा जे प्रतिपाळ करतात, ते अत्यंत दुःखी होतात. पोटाच्या आत करट झाले तर ते जसे फोडता येत नाही, त्याप्रमाणे वाईट संततीचा संसार कडू असून तो दुःख भोगायला लावतो. याचप्रमाणे पदरी ‘द्रव्य’ असून ते सत्पात्री दान न करणे हेच सर्व दुःखाचे मूळ होय. म्हणून द्रव्यलोभ्याला भयंकर दुःख भोगावे लागते. द्रव्य मिळविण्याकरिता अनेक प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती व घातपात करावे लागतात. अनेक प्रकारची संकटे व दुःखे सोसून द्रव्य मिळविलेच तर त्याचा साठा करून संरक्षण करावे लागते. त्या द्रव्याकरिता प्रत्यक्ष बायका-मुलेसुद्धा घात करायला तयार होतात मग इतरांची गोष्ट काय सांगावी!
सत्पात्री दान न करता ज्याने कुबेराचे धन रक्षण करून ठेवलेले असते, त्याच्या ठिकाणी अतिशय दुःखामुळे विघ्ने उत्पन्न होतात आणि त्यात धर्माचे रक्षण होत नाही. अशा रीतीने राखलेलेही द्रव्य गेले तर मग त्यासाठी अत्यंत दुःखाचा भडका उडतो. म्हणून श्रीमंतांना शेकडो जन्म घ्यावे लागतात व ते कोटय़वधी दुःखेच भोगीत असतात. आता वाणीबद्दल सांगतो ऐक, नरदेहाला येऊन ज्याला अव्यंग वाणी प्राप्त झालेली आहे आणि तरीदेखील जो हरिनामाचा उच्चार करीत नाही, त्याच्यापाशी पातक हे ठेवलेलेच आहे. आसन, ध्यान, ह्यांच्या खटपटीत न पडता जो राम राम म्हणतो, त्याच्या कोटय़वधी जन्मातील कष्टांचा परिहार त्यायोगाने होतो. तीच वाणी अति उत्तम होय. जो नित्य रामनामाचा जप करतो, तो परमेश्वरासारखाच आहे असे समज. सर्व नियम त्यानेच पाळले असे होईल आणि सर्व पुरुषात तोच उत्तम पुरुष होय हे लक्षात ठेव. चतुर्वर्णामध्ये जो वाणीने रामनामाचा जप अविश्रांत करील, तोच माझा आवडता होतो. त्रिभुवनातही मला त्यावाचून दुसरा कोणी आवडता नाही. असे रामनाम ज्याला आवडत नाही, त्याच्या तोंडाला पातकरूपी मुखरोग झाला म्हणून समज. तो आपणच आपल्या सुखाला मुकला व आपणच आपला घातक झाला असे समज.
रामनामाशिवाय जे तोंड असेल ते केवळ चामडय़ाचे कुंडच समजावे आणि त्यात असलेली जीभ म्हणजे केवळ चामडय़ाचा तुकडा होय. असत्य मलाच्या पुटांनी ती जीभ भरलेली असते. क्रमशः