प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाबळेश्वर तालुक्याचा जाणतं आणि देवनेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशनचे दिल्लीचे अध्यक्ष पुस्तकांच्या गावचं एक सक्षम नेतृत्व महाबळेश्वर तालुक्याचा देवमाणूस राष्ट्रवादीचे नेते प्रल्हाद उर्फ बाळासाहेब दादा भिलारे यांचे रविवारी 72 व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल जिल्हय़ाबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार शरद पवार यांच्यासह जिल्हय़ातील मंत्री, आमदार व राष्ट्रवादी पदाधिकाऱयांनी शोक व्यक्त केला आहे.
गेले दीड ते दोन महिन्यापासून बाळासाहेब भिलारे हे अल्प आजाराने दवाखान्यात उपचार घेत होते. काही दिवसापूर्वी त्यांना बरे वाटत असल्याने त्यांना घरी आणण्यात आलेल्या आले होते, परंतु रात्री अचानक तब्येत बिघडल्याने दादांना दवाखान्यात दाखल केले होते, परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रल्हाद उर्फ बाळासाहेब भिलारे (दादा) महाबळेश्वरच्या राजकारणातला एक दृष्टा नेता. सदैव जनतेच्या तनामनात असलेला, जनतेच्या हितासाठी कायम झटणारा, जनतेची आस्मिता जागवणारा नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.
स्व. एम. आर. भिलारे यांच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक वारसातून भिलारे दादांनी समाजकारणात सक्रिय झाले. राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ते तालुकाध्यक्ष असा पक्षसंघटनेत आघाडीवर राहत दादांना लोकांनी 1992 जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा निवडून दिले. या निवडीनंतर अनेक राजकीय स्थितंतर आली पण दादा मागे हटले नाहीत. तब्बल 6 वेळा दादा जिल्हा परिषद सदस्यपदी सलग निवडून आले. दुर्गम मश्वर तालुक्याचे अनेक अडचणी प्रश्न दादांनी सोडवले. तालुक्याला पर्यटनदृष्टय़ा विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या. कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती केली. स्ट्रॉबेरीला राजमान्यता मिळवून देण्यात दादांचा सिंहाचा वाटा आहे. 1987 साली हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून भिलार येथे इंग्रजी माध्यम व हिलरेंज माध्यमिक विद्यालय, राजपुरी येथे कै. एम. आर. भिलारे हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळा दादांनी सुरु केल्या. आदिशक्ती पुरस्कार, समाजभूषण, बंधुत्व पुरस्कार, इंदिरा गांधी सदभावना पुरस्कार, विकासरत्न, जीवनगौरव आदी पुरस्कार त्यांना मिळाले.
सत्तेच्या खुर्चीवर राहूनही आपले पाय जमिनीवर ठेवणारी, सत्तेत नसतानाही समाजकारणात गढून गेलेली आणि आपण ज्या मातीतून आलो आहोत, त्या मातीशी आपली नाळ कायम नाहीतर अगदी घट्ट ठेवणारी माणसे राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. नुसत्याच सभा गाजवण्यापेक्षा तळागाळात विकासाची गंगा पोहोचवून त्या लोकांचे आशीर्वाद नेहमी पाठीशी ठेवणारे लोकनेते आणि स्वतः आमदार झालो नाही तरी इतरांना त्या पदापर्यंत पोहोचवणारी ताकद निर्माण करणारे म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल.
महाबळेश्वर तालुक्याचे उत्तुंग, हिमालयाएवढे उंची असणारे, दूरदृष्टी असणारं व्यक्तीमत्व त्यांचे होते. महाबळेश्वर तालुक्यात बाळासाहेब भिलारे यांना जनता देव मानत होती. देवत्वाचे गुण असलेला हा नेता गेल्याने आमचा महाबळेश्वर तालुका खरोखर पोरका झाला आहे.
सुसंस्कृत नेता हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार
बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला आहे. महाबळेश्वर-पांचगणी विकासासह पर्यटनवाढीसाठी त्यांनी तळमळीने काम केले. त्यांच्या निधनाने सातारा जिह्याने कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे. राजकीय सामाजिक चळवळीशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. मी बाळासाहेब भिलारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भिलारे कुटुंबियांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.