मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून आम्ही सारे शिक्षक ‘ऑनलाईन’ शिक्षण प्रणालीकडे वळलो आहोत. अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षण, परीक्षा, प्रवेश परीक्षा, अंतर्गत मूल्यांकन यासारख्या अनेक गोष्टी ऑनलाईन माध्यमांद्वारे पार पडून आता उभयपक्षी सरावाच्या देखील झालेल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक मर्यादा मान्य करूनही आजमितीला ‘ऑनलाईन’ ही बाब अपरिहार्य झालेली आहे. गोष्टी ‘अटळ’ झाल्याशिवाय त्याबाबतची ‘स्वीकृती’ न अंगीकारणारा एक वर्ग सर्वत्र आढळून येत असतो. नानाविध क्षेत्रात, प्रांतात अनेक बाबतीत कुरकुर करणाऱया या ‘नाना’ संप्रदायांबाबत प्रश्न कौशल्य प्रशिक्षणाचा नसून प्रवृत्ती बदलाचा असतो. ‘असतील त्यांच्या सोबत, नसतील त्यांच्या शिवाय’ हा आजच्या तरुणाईकडून शिकण्यासारखा मंत्र आहे.
सद्यस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये पारस्परिक संवाद आणि आंतरक्रिया सहज घडून येत असतील या मिथ्या गृहितकातून आम्ही शिक्षकांनी बाहेर पडायला हवे. एरवी, प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणामध्येही प्रत्येक विद्यार्थ्याची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंतरक्रिया वृद्धीसाठी शिक्षकांना विशेष प्रयत्न करावे लागतात. अभ्यासपूरक (को-करिक्मयुलर) आणि अभ्यासेतर (एक्ट्रा-करिक्मयुलर) उपक्रमांमधून, वैयक्तिक प्रोत्साहनातून या गोष्टी घडत असतात. ऑनलाईन शिक्षणामधील या मुख्य मर्यादेवर आम्ही काही शिक्षक गेले वर्षभर मात करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एरवी, उच्च शिक्षण क्षेत्रापेक्षा प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये तुलनेने जास्त प्रयोग होत असतात. सांप्रत काळात ऑनलाईन शिक्षणाद्वारे प्रयोगाबाबतची अनुकूलता उच्च शिक्षण क्षेत्राला लाभलेली आहे.
आमचा समाजकार्य प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम हा प्रात्यक्षिकांमधून शिकण्यावर आधारित आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, पारिचारक, व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन, कायदा आणि जवळजवळ साऱयाच ज्ञानशाखांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाधारित शिकण्यावर भर आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे काम पर्यवेक्षकांसोबत करावयाचे असते ही बाब व्यवस्थापकीय रचनेसाठी बरोबर असली तरी सारेच पर्यवेक्षक चांगले संवादक, प्रोत्साहक आणि समुपदेशक असतातच असे नाही. आत्ममग्नता, संभाषण विन्मुखता आणि कोरडेपणा या दोषांनी आता शिक्षणक्षेत्रालाही ग्रासले आहे. ‘विद्यार्थ्यांनी शिक्षकांना घाबरले पाहिजे, ही जुनाट आणि रोगट मानसिकता बाळगणारे शिक्षक दुर्दैवाने अजूनही आहेत. विद्यार्थ्यांना समृद्ध करणारा पारस्परिक संवाद अनेकदा शिकण्याचे चांगले माध्यम ठरू शकते. उद्योग व्यवसायात नुकसान टाळण्यासाठी पाश्चिमात्य देशांमध्ये ‘बडी सिस्टिम’ (भ्रातृभाव रचना) आजही उपयोगात आणली जाते. भारतामध्ये नवउद्योजकांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्यासाठी ‘मेंटी’ आणि ‘मेन्टॉर’ या रूढ झालेल्या कल्पनेचे हे आद्य स्वरुप आहे.
‘बडी सिस्टीम’ म्हणजे नवख्या उमेदवाराकडे ज्ञान, माहिती, आत्मविश्वास, सहजता यासारख्या गोष्टींचे हस्तांतरण करण्याच्या जबाबदारीचे संघटनात्मक प्रारुप. व्यवस्थापकांच्यावतीने कामगारांमधील एखाद्या संवादोत्सुक, आशावादी, स्वयंप्रेरित माणसांना ही ‘बडी’ होण्याची जबाबदारी दिली जाते. या बडी सिस्टीममुळे पारस्परिक आदर, विश्वास, तद्नुभूती, समजूतदारपणा वाढून उत्पादन प्रक्रियेशी चटकन समरस होण्याचे दाखले जगभर आहेत. आम्ही ‘बडी सिस्टीम’ची प्रक्रिया आमच्या अभ्यासक्रमात राबवत आहोत. कोलंबिया विद्यापीठाच्या भाषाशास्त्र विभागाद्वारे आणि इतत्रही ही पद्धत यशस्वीरित्या राबविली गेली आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेण्याची, उपक्रम आखण्याची आणि संवादाची रचना तयार करण्याची जबाबदारी आम्ही आमच्या माजी आणि काही वरि÷ विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांना जमेल की नाही या आमच्या शंकेला विद्यार्थ्यांनी फोल ठरवले. राजस्थान, केरळ, हिमाचल प्रदेश, लडाख, हरियाणा, दिल्ली, मुंबई, बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू, काश्मिर, आंध्र प्रदेश यासारख्या अनेक राज्यात आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या जिल्हय़ातील वा परिसरातील ‘बडी’ मिळवून देण्यात यशस्वी ठरलो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत कितीही मोकळेपणाने, बरोबरीने संवाद केला तरी शिक्षकांच्या ‘शिक्षक’ असण्याचे दडपण विद्यार्थ्यांवर असतेच. शिवाय कितीही नाही म्हटले आणि कितीही प्रयत्न केले तरी मार्कांचे भूत उभय पक्षांच्या मनात असतेच. ‘बडी सिस्टीम’मुळे माजी विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेत औपचारिक स्थान मिळाले. सांप्रत कोरोना काळात जिथे शिक्षकांना, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्मय नाही तेथे शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून ‘बडी’ भेटू शकले. विद्यार्थ्यांना समवयस्क ‘बडी’ मिळाले आणि संवादाचे शिक्षणाचे वर्तुळ पूर्ण होतानाच विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना पाठबळ मिळत गेले. शिक्षकांच्या अपेक्षांपेक्षा ‘बडी’च्या अपेक्षा जास्त जवळकीच्या ठरल्या. ‘बडी’नी देखील न सांगता आपल्या कक्षेबाहेर येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शना पलीकडीलसोबत केली. ‘बडी’ हा शिक्षण प्रक्रियेतील सहयात्री ठरल्यामुळे या शिकण्यात गतिमानता आली. आम्ही शिक्षकांनी निव्वळ मार्गदर्शकाच्या भूमिकेतून बाहेर येऊन ‘सहयात्री’ बनणे गरजेचे आहे, हा आम्हा शिक्षकांनाही धडा होता.
‘बडी सिस्टीम’ रुजल्यावर एकाच स्वरुपाच्या प्रश्नावर मात्र वेगवेगळय़ा राज्यात काम करणाऱया विद्यार्थ्यांच्या जोडय़ा तयार करून आम्ही समन्वय शिक्षणाकडे (कोलॅबेरेटीव्ह लर्निंग) वळण्याचे ठरवले. उदाहरणच घेऊन सांगावयाचे झाल्यास राजस्थानमध्ये नरेंद्रचा गावपातळीवरील ‘युवा भागिदारीतून ग्राम विकास’ हा क्षेत्रकार्य प्रकल्प शिगेला होता, तर त्याचा हरियाणातील समन्वयक मोनूचा प्रकल्प प्राथमिक अवस्थेमध्ये होता. मोनूचे चाचपडणे, निराशा नरेंद्र मार्फतच दूर व्हायला लागले. शिक्षणाचे प्रारुप समन्वयाचे असले तरी नरेंद्रकडे आपसुकपणे नेतृत्वाची धुरा येत होती. शिक्षक आणि पर्यवेक्षक म्हणून आमचे काम तुलनेने सोपेच होत राहिले. या समन्वय शिक्षणातून वीस हजारांच्यावर मुखपट्टय़ा तयार झाल्या. मुखपट्टय़ा लडाखमधील महिलांनी शिवल्या आणि केरळमध्ये विकल्या गेल्या. सुहेल नावाच्या विद्यार्थ्याने तर त्याच्या गावच्या ग्रा.पं.मध्ये ‘कोविड वॉर रूम’ तयार करून ‘मदत कक्ष’ उभारला आहे. या ‘कोविड वॉर रूम’मधून गावातील कोविड रुग्ण आणि बाहेरील मदत संस्था आणि अधिकारी वर्गाचे उत्तम नियोजन होत आहे. मदतीची पुनरावृत्ती टाळून गावकरी भीती आणि निराशेवर मात करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या ‘अवाक्’ करणाऱया कामांमधून आम्हा शिक्षकांचा उत्साह दुणावलाच आहे. अनेकदा मी आणि माझे विद्यावाचस्पती विद्यार्थी आमच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे तास एकत्रितपणे घेतो. माझ्यापेक्षाही माझ्या विद्यावाचस्पती विद्यार्थ्यांचे तास विद्यार्थ्यांना अधिक आवडतात. विद्यार्थ्यांकडून हा फीडबॅक ऐकून मला श्रीमंतीचा अनुभव येतो. त्यांच्या ‘बडी’ असण्याची करामत मी आणि माझे सहकारी सद्याच्या आव्हानात्मक काळातही ‘एन्जॉय’ करत आहोत.
डॉ. जगदीश जाधव