काँगेस नेते अधीर रंजन चौधरी यांचे राष्ट्रपतींना पत्र
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लोकसभेतील काँगेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्र पाठवून संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली आहे. देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन घ्यावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून संसदेसमोर सरकारने स्थिती स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली.
कोरोनाच्या नव्या उदेकाने देशभर हाहाकार माजविला आहे. ऑक्सिजनचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा देशभर जाणवत असून केंद्र सरकार या वायूचा पुरवठा करण्यात अपयशी ठरले आहे. मृत्यूदर वाढत असून रुग्णसंख्याही दिवसेंदिवस प्रमाणाबाहेर वाढत आहे. तथापि, सरकार जनतेला नेमकी परिस्थिती काय आहे, हे स्पष्ट करत नाही. त्यामुळे संसदेचे अधिवेशन बोलावल्याशिवाय पर्याय नाही. अधिवेशन बोलाविल्यास सरकारला लोकसभा व राज्यसभेत धारेवर धरून माहिती घेणे विरोधकांना शक्य होईल. तसेच जनतेलाही नेमके काय चालले आहे, हे समजून येईल. सरकार संसदेपासून माहिती लपवू शकणार नाही. म्हणून त्वरित अधिवेशन बोलाविण्याचा निर्णय घ्यावा, असे चौधरी यांनी प्रतिपादन केले आहे.
केवळ उपचार
चौधरी यांचे हे पत्र केवळ एक उपचार असून सरकारचा निषेध व्यक्त करण्याचा हा एक सांकेतिक मार्ग आहे. कारण राष्ट्रपतीने स्वतःच्या इच्छेने संसदेचा अधिवेशन बोलाविता येणार नाही. केंद्र सरकारने सूचना केली तरच ते असे अधिवेशन बोलावू शकतात. त्यामुळे त्यांना पत्र पाठवून उद्देश साध्य होणार नाही. केंद्र सरकारकडे आग्रह धरावयास हवा. केंद्राने अधिवेशनाला मान्यता दिल्यासच राष्ट्रपती तशी कार्यवाही करू शकतात, असे कायदेतज्ञांचे मत आहे.