सातारा/प्रतिनिधी
सध्याच्या कोरोना परिस्थितीत बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार पालिकेच्यावतीने करण्यात येतात.त्या कोविड योद्धा व सातारा नगरपालिकेचे चालक यांना ५०लाखांचा विमा मिळवून देण्यासाठी सातारा शहर शिवसेना प्रयत्न करणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
सातारा शहर व जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढतच आहे. संपूर्ण सातारा तालुक्यामधील करोना रोगाने मृत पावलेल्या व्यक्तींवर माहुलीला सातारा नगरपालिकेच्या अधिपत्याखाली रितसर अंत्यसंस्कार केले जातात. यातही कोरोनाबाधित मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सातारा जिल्हापरिषद,पंचायत समितीच्या सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अगर सिव्हील हाॅस्पिटल मधील कर्मचाऱ्यांच्या नेमणूका केल्या नाहीत. तर सातारमधील सर्व करोनाबाधित मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी माजगावकर माळ झोपडपट्टीतील आरोग्य विषयक ज्ञान नसलेल्या चार गरजू,गरीब तरुणांना विना ठराव सातारा नगरपालिकेमार्फत (प्रशासन) नियमबाह्यरित्या काम दिले जाते.प्रत्येक अंत्यसंस्कारामागे दोन हजार रुपये त्यांना रोख दिले जातात.परिस्थितीमूळे चार युवक आपल्या जिवावर उदार होऊन असे करोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करीत असतील.तसेच मृतव्यक्तीला माहुलीला नेण्यासाठी गोडोली अंत्यसंस्कार मंडळाची गाडी आहे.या गाडी चालविण्यासाठी मात्र सातारा नगरपालिकेचेच एकूण चार ड्रायव्हर आळीपाळीने कर्तव्य बजावत असतात.
सातारा नगरपालिकेचा एक सॅनिटरी इन्स्पेक्टर याबाबतचा सर्व कागदोपत्री सोपस्कार पार पाडत असतो.म्हणजेच मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी ते खाजगी चार युवक व सातारा नगरपालिकेचा एक ड्रायव्हर असे एकूण ५ जणच त्या करोनाबाधित मृत व्यक्तीच्या जवळ असतात. या पाचही जणांना प्रशासन पीपीई किट व मास्क देतात.पण सदरहू पीपीई किटही चांगल्या दर्जाचे नसतात व मास्कही N-95 चे न देता साधेच दिले जातात.म्हणजेच स्वताच्या व कुटुंबियांच्या जिवाची पर्वा न करता करोनाबाधित मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे अनमोल काम करणाऱ्या या ४ गरजू तरुणांच्या व सातारा नगरपरिषदेच्या ४ ड्रायव्हरांच्या आरोग्यासाठी प्रशासन हवी ती खबरदारी घेत नाही तसेच दररोज किमान १५ ते २० करोनाबाधित व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे प्रत्यक्ष संपर्कात येवूनही प्रशासन यांचे सुरक्षेविषयी निष्क्रीयच दिसते.प्रशासनाने या ८ व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे किमान ५० लाखांचे विमे उतरविले पाहिजेत.
तसेच माहुलीला करोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सातारा नगरपालिकेचेच ४ ड्रायव्हरच सेवेत का?सातारा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील अगर सिव्हील हाॅस्पिटलमधील ड्रायव्हरांना अशी सेवा करण्याची ड्यूटी का नाही?कोरोना बाधित मृतांच्या प्रत्यक्ष संपर्कात दररोज जाणाऱ्या या ८ व्यक्तींच्या धाडसाला मानाचा मुजरा, असे बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.