बिदाल (ता. माण) येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मणराव राऊत यांची जेष्ठ कन्या उज्ज्वला यांचा विवाह खटाव येथील तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते, बागायतदार बापूसाहेब विधाते (आप्पा) यांचे सुपुत्र प्रदिप विधाते यांच्याशी 1998 साली झाला. मुलगा पोस्ट गॅज्युएट शिवाय शेतीचा छंद या बेसवर मुलगी दिली. डामडौलात लग्न झालं…. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी सत्यनारायण पुजा झाली. पहिलीच रात्र आणि अचानक नव वर गायब झाला. काय वाटले असेल त्या माऊलीला? मात्र ज्या कामासाठी पती रात्री बाहेरगावी गेले ते दुसऱ्या दिवशी उमजल्यानंतर त्या माऊलीने समर्पित जीवन जगण्याचा दृढ संकल्प केला. पती प्रदिप विधाते एका विशिष्ट राजकीय उंचीवर पोहोचले आहेत. स्वत: उज्वलाताईंनी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले आहे. असे असले तरी आजही त्या शेतामध्ये रोजगाऱयांसमवेत काबाडकष्ट करत आहेत.
बिदालच्या राऊत यांच्या उज्वला या मोठय़ा एकमेव कन्या. तर तीन पुत्र होते. त्यापैकी बाळासाहेब व सावता हे दोन हयात आहेत. पहिली मुलगी असल्याने उज्वलाताईंचे चांगल्या पध्दतीने लग्न लावून दिले. त्यांचे पती अर्थशास्त्र विषय घेवून एम. ए. झालेले. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत त्यांना निश्चितपणे प्राध्यापकाची नोकरी मिळण्याची संधी होती. शिवाय घरची 30 ते 35 एकर शेती, या शेतीमध्ये पानमळा, द्राक्ष बाग ही बागायती पिके घेतली जात होती. प्रयोगशील युवा शेतकरी म्हणून प्रदिपआण्णांची ओळख झाली होती. या बेसवर राऊतांनी विधातेंच्या घरात मुलगी दिली. लग्न झाले, सत्यनारायण पुजा झाली. पुजेवरुन नवरदेव उठून इकडे-तिकडे गेले असता अचानक त्यांना निरोप आला. गावातील खालसा टायपिंग सेंटरचे मालक गुलाबसिंग खालसा यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. खालसा यांनी मरणोत्तर ध्येयदानाचा संकल्प केला होता. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून प्रदिपआण्णांची सही होती. त्यामुळे त्यांचे पार्थिव घेऊन कराडच्या कृष्णा हॉस्पिटलला जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. घरी सांगितले तर घरचे जाऊ देणार नाहीत. या अनामिक भितीने प्रदिपआण्णांनी अचानक कराडला जाणे पसंत केले. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेने घरात एकच हल्लकल्लोळ माजला. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव गायब झाला. शिवाय त्याकाळी आत्ताच्यासारखे मोबाईल अथवा लॅन्डलाईन फोनची सुध्दा सुविधा नव्हती.
निवडणुकीचे राजकारण
राजकारणातील ठराविक लोकांची मक्तेदारी संपुष्टात आणावी या भूमिकेने प्रदिप आण्णांनी आपली वाटचाल सुरु केली होती. त्याचाच एक भाग म्हणून 1992 साली गावामध्ये पिंपळेश्वर संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या बळावर त्यांनी 1997 साली तत्कालीन आमदार भाऊसाहेब गुदगे यांच्या नेतृत्वाखाली खटाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढविली. मात्र अनुभव नसल्यामुळे त्यांना या निवडणुकीत हार पत्करावी लागली. तद्नंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार कै. केशवराव पाटील, कै. मनोहर पाटील (मामा) या दोघांना हाताशी धरत प्रदिप आण्णांनी गावातील ग्रामपंचायतीची एकहाती सत्ता हाती घेतली. या प्रवासादरम्यान त्यांचा गावात मोठा संघर्ष झाला. या संघर्षातून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्याची थेट झळही उज्वलाताईना बसली होती. तद्नंतर 2002 साली प्रदिपआण्णा माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर यांच्या नेतृत्वाखाली खटाव तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून तब्बल 1600 मताच्या फरकाने विजयी झाले. निवडणुकीनंतर त्यांना विरोधी गटनेते पदाची जबाबदारी मिळाली. या पाच वर्षात अभ्यासपूर्ण कामकाज करत खटाव गणात कोटय़वधींची विकासकामे झाली. तरीही जनतेने 2007 साली त्यांना पंचायत समितीला नाकारले. या गोष्टीचा त्यांच्या मनावर आघात झाला. या परिस्थितीतून सावरण्यासाठी उज्वला वहिनी व कुटुंबियांनी त्यांना मोठा मानसिक आधार दिला. त्याचाच परिपाक म्हणून 2012 साली झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत सर्वसाधारण महिला आरक्षण असताना देखील उज्वला विधाते या खटाव गणातून मताधिक्याने विजयी झाल्या. सभापतीपदासाठी मोठी रस्सीखेच असतानासुध्दा प्रदिप आण्णांनी मोठय़ा मुत्सदीगिरीने उज्वलाताईंना सभापती पद मिळवून दिले. जेमतेम सव्वा वर्षाचा कालावधी मिळूनसुध्दा दोघा पती, पत्नींनी पूर्णवेळ राबून सभापतीपदाचा दर्जा उंचावण्याचे काम केले. तद्नंतर प्रदिप आण्णांना जिल्हा बँकेवर ओ.बी.सी. प्रवगातून संधी मिळाली. पाठोपाठ एका वर्षाने झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही ते खटाव गटातून मताधिक्याने विजयी झाले. दीड वर्षापूर्वी त्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाचाही बहुमान मिळाला आहे.
पतीची एका बाजूने उत्तरोत्तर प्रगती होत असताना दुसऱया बाजूने पत्नी उज्वलाताई त्यांना खंबीरपणे एका बाजूने साथ देत आहेत. संपुर्ण कुटुंबाचे जेवण बनविण्याबरोबर त्या शेतातील कामेही रोजगाराच्या बरोबरीने करत असतात. पतीचे राजकारण, कष्टाची कामे करत असतानाही त्यांनी आपली मुले चांगली घडविण्याचा प्रयत्न केला आहे. मुलगा प्रतिक हा बी. एस्सी. झाला आहे. लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून त्याने करिअर करावे अशी कुटुंबियांची इच्छा आहे. मुलगी प्रतिक्षा ही बी.कॉम. झाली आहे. या दोघांना शिक्षण व संस्कार देण्यामध्ये उज्वलाताईंचा मोठा वाटा आहे.
त्या स्वत: खटाव पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले आहे. पती पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक या महत्वाच्या संस्थांमध्ये कार्यरत आहेत. याचा कसलाही गर्व उज्वलाताईंना नाही. आजही त्या शेतातील बटाटे काढण्याचे काम मजुरांबरोबर करतात. पती उच्चपदावर असल्याने त्यांच्या बाराबिगा शिवारातील बंगल्यावर नेहमीच लोकांची वर्दळ असते. घरी येणाऱ्या प्रत्येकाचे हसतमुख स्वागत करण्याबरोबरच त्यांचे चहापान करण्याची जबाबदारी त्या व्यवस्थित पार पाडत असतात. हे सर्व करत असताना त्यांची राहणीमान अत्यंत साधी आहे. त्यांच्या या साध्या राहणीमानाचा व कामकाज पध्दतीचा इतर महिलांनी आदर्श घेण्याची गरज आहे.
-शब्दांकन : धनंजय क्षीरसागर, वडूज -संकलन : संजयकाका देशमुख, खटाव