प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
रेशनकार्ड नसलेल्या जिल्हय़ातील 72 कातकरी आदिवासी कुटुंबियांना तातडीने रेशनकार्ड उपलब्ध करून द्या, असे आदेश देत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी रेशनकार्ड नसतांनाही विशेष बाब म्हणून रेशनवरील विशेष सवलतीचे धान्य उपलब्ध करून दिले आहे. याबाबत आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य करणाऱया शोषितमुक्ती अभियानाचे अध्यक्ष उदय आईर यांनी आदिवासींच्यावतीने त्यांचे आभार मानले.
जिल्हय़ात 311 आदिवासी कुटुंब असून त्यातीत 72 कुटुंबियांकडे अद्याप रेशनकार्ड नाही. त्यामुळे शासकीय योजनेतील सवलतीच्या दरातील धान्य या आदिवासींना उपलब्ध होत नव्हते. या लॉकडाऊनच्या काळात रोजगाराचे सगळेच मार्ग बंद झाल्यामुळे तसेच रेशनवरील सवलतीचे धान्य मिळत नसल्यामुळे या 72 कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येत होती. दात्यांकडून मिळणाऱया मदतीवरच त्यांना अवलंबून राहावे लागत होते. ही बाब उदय आईर यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी याची दखल घेत आदिवासी बांधवांना तातडीने रेशनकार्ड काढून द्या, असे आदेश तालुका महसूल यंत्रणेला दिले. त्यामुळे येत्या आठवडाभरात रेशनकार्डपासून वंचित असलेल्या जिल्हय़ातील त्या 72 कातकरी आदिवासी कुटुंबियांचा रेशनकार्डचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, रेशनकार्ड मिळेपर्यंत या आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी त्यांनाही अन्य आदिवासी बांधवांप्रमाणे रेशनवरील सवलतीचे धान्य उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.