पर्ससिननेट नौकांच्या परवान्याची तपासणी करण्याची मागणी
वार्ताहर/ तवसाळ
वादळी वारा व मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असला तरी या वादळाचा परिणाम आजही खोल समुद्रामध्ये दिसून येत आहे. परिणामी सुरक्षेसाठी जयगड खाडीत आश्रयासाठी आलेल्या सुमारे 800 मच्छीमारी नौका शनिवारीही जयगड खाडीमध्ये नांगर टाकून उभ्या आहेत. या बहुतांशी नौकांवर पर्ससिननेट दिसून येत असल्याने त्याच्या परवान्याची तपासणी बंदर विभागाने करणे आवश्यक आहे.
तालुक्यात सर्वाधिक सुरक्षेचे ठिकाण म्हणून जयगड खाडी व वेलदूरची दाभोळ खाडी मानली जाते. दाभोळ खाडीत बाह्य राज्यातील नौका येत नाहीत, परंतु जयगड खाडीत उरण, करंजा, मुंबईसह कर्नाटक, केरळ, गोवा व गुजराथ या राज्यांतील मच्छीमार नौका आश्रयाला येतात. या नौकांवर पर्ससिननेट मोठय़ाप्रमाणात दिसून येत आहे. ज्यांच्याडे पर्ससिननेट मासेमारीचे परवाने आहेत अशांनाच मासेमारी करता येते, परंतु ज्यांच्याकडे परवाने नाहीत त्यांच्यावर शासनाने बंदी घातली आहे. यामुळे जयगड खाडीत विसावलेल्या या नौकांची परवाने तपासणी करणे आवश्यक आहे. या खाडीत कर्नाटक, केरळ, गोवा, गुजराथ येथील नौका दिसून येत आहेत. मासेमारीकरिता राज्य बंदी आहे. एका राज्यातून दुसऱया राज्यात मासेमारी करता येत नाही. असे असताना या नौका कशा याठिकाणी येतात याचीही चौकशी संबंधीत अधिकाऱयांनी करणे आवश्यक आहे.
सुसज्ज बंदराची आवश्यकता
जयगड खाडी ही सुरक्षेचे ठिकाण आहे. वादळसदृश्य स्थिती व अन्यवेळी या बंदराचा चांगला उपयोग होतो. आज वादळामुळे आश्रयाला आलेल्या नौकांवर मासेमारी केलेले मासे आहेत. जास्त दिवस थांबावे लागले तर ते मासे उतरवून घेणे गरजेचे आहे. मात्र तशी व्यवस्था या खाडीमध्ये नाही. जर या खाडीमध्ये सुसज्ज बंदर झाले तर रत्नागिरी व गुहागर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या दोन्ही गावांचा अधिक विकास होईल, असेही येथील मच्छिमार व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
जयगड खाडीतील पाणी लाल
जयगड खाडीला समुद्राच्या भरती-ओहोटीचेही पाणी लागते, परंतु ही खाडी अनेक गावांना स्पर्श करून येते. पावसाळय़ामध्ये या निळय़ा खाडीला लाल रंग जडतो तो डेंगरावरून येणाऱया नदी, नाल्यांच्या चिखलमय पाण्यामुळे. याप्रमाणे गुरूवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे खाडीतील पाणी लाल झालेले पहावयास मिळत आहे. दुसऱया दिवशी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी या निळय़ा खाडीचा आजही लाल रंग दिसून येत आहे.