मुख्यमंत्र्यांना ‘पप्पू’ संबोधल्याबद्दल संताप : पायाखालची वाळू सरकायला लागल्याने खंवटेंकडून बेताल वक्तव्ये
प्रतिनिधी / मडगाव
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी पप्पू असे संबोधल्याने भाजपाच्या दक्षिण गोवा जिल्हा समितीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ज्या व्यक्तीला ज्ञान नाही अशा व्यक्तीला पप्पू संबोधले जाते. असा एकच माणूस भारतात आहे याची जाणीव खंवटे यांना नाही काय, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्री सावंत हे पेशाने डॉक्टर आहेत आणि 16 ते 18 तास ते राज्याचा कारभार हाताळत असतात याचे भान खंवटे यांनी ठेवावे, असे जिल्हा अध्यक्ष तुळशीदास नाईक यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी शर्मद रायतूरकर, सुनील नाईक व सत्यविजय नाईक उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आमदार खंवटे यांचे एखादे मोठे काम बरोबर नसल्याने अडवून ठेवले असावे आणि त्यामुळेच ते अशी बेताल वक्तव्ये करत असावेत, असे अध्यक्ष नाईक म्हणाले. आमदार खंवटे यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने तोल जाऊन ते अशी बेताल व्यक्तव्ये करू लागले आहेत. आगामी निवडणुकीत पर्वरीतील मतदार आपल्याला आपली जागा दाखवतील याची भीती त्यांना सतावू लागली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पर्वरीतील मतदार कसे वाढले ते सांगा
मजुरांच्या विषयावरून भाष्य करण्यापूर्वी पर्वरीतील 17 ते 18 हजार असलेले मतदार पाच वर्षांत 24 ते 25 हजार कसे झाले याचे उत्तर खंवटे यांनी जनतेला द्यावे, असे नाईक म्हणाले. पर्वरीतील जैविक संपदा कशी नष्ट झाली त्याचे उत्तर त्यांनी द्यावे. दहावीच्या परीक्षेच्या विषयावरून खंवटे व अन्य विरोधक राजकारण करू पाहत होते. उच्च न्यायालयाने त्यांना चांगलाच तडाखा दिला, असे असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते संधिसाधू ः रायतूरकर मुख्यमंत्री सावंत तसेच मंत्री मायकल लोबो यांच्यावर आमदार खंवटे यांनी केलेल्या टीकेचा रायतूरकर यांनीही समाचार घेतला. मुख्यमंत्री व अन्य सर्व मंत्री चांगले कार्य करत असून त्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचे नाव न घेता त्यांच्यावर संधिसाधू विरोधी पक्षनेता अशी टीका त्यांनी केली. सरकारने दहावीच्या परीक्षेसाठी सर्व काळजी घेऊन उत्तम सोय उपलब्ध केली असल्याचे सांगून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांच्या मनात भीती घालण्याचे बेजबाबदारपणाचे काम त्यांनी केले, अशी टीका रायतूरकर यांनी यावेळी केली. सरकारने ‘कोव्हिड-19’संबंधीची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली असून त्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री चांगली कामगिरी करत आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले.