प्रतिनिधी / पणजी
प्रसिद्ध कोकणी साहित्यिक, कोकणी समर्थक तसेच 1980 च्या दशकात कोकणी राजभाशेसाठी झालेल्या आंदोलनात सक्रीय भूमिका बजावलेल्या ’कोकणी प्रजेचो आवाज’ या संघटनेचे नेते दत्ता श्रीपाद नाईक यांचे दि. 23 सप्टेंबर रोजी निधन झाले.
1940 मध्ये डिचोली येथे जन्मलेल्या दत्ता नाईक यांनी पुणेतील वाडिया अभियांत्रिकी महाविद्यालयातून बांधकाम अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी स्वतःची बांधकाम कंपनी स्थापन करून गोव्याच्या बांधकाम क्षेत्रात दबदबा निर्माण केला. सुमारे 30 वर्षे ही कंपनी त्यांनी चालविली. त्याचबरोबर कोकणी साहित्य क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. स्वतःची सवंगडी प्रकाशन ही संस्था स्थापन करून त्याद्वारे अनेक कोकणी पुस्तकांचे प्रकाशन केले.
राजकीय क्षेत्रातही त्यांचा वावर मोठा होता. भारतीय जनता पक्षाची गोव्यात गोव्यात स्थापना करणारे ते एक संस्थापक सदस्य होते.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर दोनापावला येथील मणिपाल इस्पितळात उपचार सुरू होते. त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पूत्र आणि कन्या असा परिवार आहे. आप या राजकीय पक्षाचे गोव्यातील नेते वाल्मिकी नाईक यांचे ते वडील होत.