वार्ताहर / कास
खरोशी (ता. महाबळेश्वर) येथे उपचाराअभावी डालग्यातच प्राण सोडण्याची वेळ एकावर आली असून 22 जुलैच्या अतिवृष्टीनंतर तुटलेला गावाचा संपर्क पुन्हा जोडण्यात प्रशासनाला अपयश आल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खरोशी गावचे रामचंद्र मानू कदम हे आजारी होते. त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी खरोशी गावाला चतुरबेट मार्गे महाबळेश्वरशी जोडणारा रस्ता बंद आहे तर रेनोशी मार्गे कोट्रोशी पूलावरून तापोळ्याला जाणारा रस्ता ही दरड कोसळल्याने बंद आहे.
22 तारखेला झालेल्या पावसामध्ये रस्त्याची दुरवस्था झाल्याने गावच संपर्कहीन आहे. अजूनही प्रशासनाचा एकही अधिकारी गावामध्ये आला नाही. अजूनपर्यंत गावामध्ये जाण्यायेण्यासाठी रस्ता चालू झाला नाही. यातच शुक्रवारी खरोशी गावामध्ये दुःखद घटना घडली आहे. रामचंद्र कदम (वय 75) यांच्या छातीमध्ये कळ मारत होती. त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी कोणताच पर्याय नव्हता. मोबाईल नेटवर्क ही उपलब्ध नव्हते. त्यामुळे तापोळ्यातून स्पीड बोट सुद्धा मागवता आली नाही. अखेर बाजूच्या रेनोशी गावामधून लॉन्च मागवण्यात आली. रामचंद्र कदम यांना डालग्यात भरून लॉंचपर्यंत नेण्यात आले. तोपर्यंत दोन ते अडीच तास गेले, आणि रामचंद्र कदम यांचा डालग्यातून नेतानाच मृत्यु झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.