प्रतिनिधी / विटा
राज्यमंत्र्याऐवजी कॅबीनेटमंत्रीपद मिळायला हवे होते, असे बरेचजण म्हणतात. पण दहा कॅबिनेटमंत्र्यांच्या बरोबरीचे काम करून दाखवू, मिळालेल्या पदाचा सामान्य माणसांला न्याय देता येत नसेल, तर ते राज्यमंत्रीपद काय कामाचे? शेतकऱयांच्या हितासाठी कायमस्वरूपी लढणार. सरकारने केलेली कर्जमाफी हा ट्रेलर आहे. पिक्चर अजुन बाकी आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, ना. बच्चू कडू यांनी केले.
येथील शाळा नं. 2 च्या क्रीडांगणावर ना. बच्चू कडू यांचा नागरी सत्कार आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. बच्चू कडू बोलत होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल सुतार, संपर्कप्रमुख दत्तकुमार खंडागळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी जलसंपदा राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांचे विटा शहरात आगमण होताच त्यांची बैलगाडीतून आणि पारंपारिक वाद्य, गजीढोलच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली.
ना. बच्चू कडू म्हणाले, अनाथांसाठी गेल्या 70 वर्षांत विधानसभेत एकही लक्षवेधी मांडली गेली नाही. पण मी आमदार झाल्यापासून गेल्या 15 वर्षांत 3 लक्षवेधी मांडून अनाथांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. सन 2015 मध्ये सेवा हमी कायदा अस्तित्वात आला. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली नाही. फाईल अडवणाऱया एकाही अधिकाऱयावर कारवाई झालेली नाही. चांगला अधिकारी असेल, तर त्याला डोक्यावर घेऊ. पण सर्वसामान्य जनतेची अडवणूक कराल, तर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवावे. सर्वसामान्यांना त्रास होता कामा नये. सर्वसामान्यांची अडवणूक होता कामा नये. आम्ही देखील कायद्याचे भक्त आहोत. त्यामुळे कायदा मोडणार्या अधिकाऱयांची गय करणार नाही.
कांद्याचे दर वाढल्याने त्याचा फायदा ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकऱयांनाच होणार होता. परंतु कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकताना केंद्र सरकारला का लाज वाटली नाही? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकार कांद्याच्या दराच्याबाबतीत चिंतीत होते. पण गेल्या साडेतीन वर्षांत साडेतीन लाख शेतकऱयांच्या आत्महत्या झाल्या. त्यावेळी सरकार का गप्प होते. दोन लाखांपर्यंतची जी कर्जमाफी आहे. त्यात सर्वच शेतकऱयांना न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे दोन लाखांच्या वरील जे कर्जदार शेतकरी आहेत. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. जे नियमित कर्ज भरतात. त्यांच्यावरही अन्याय होता कामा नये. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी हा पहिला टप्पा असून तीन टप्प्यात कर्जमाफी करण्याचा विचार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा कर्जमाफीचा केवळ ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे.
स्वागत आणि प्रास्ताविक सांगली जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी केले. सूत्रसंचालन धीरजकुमार भिंगारदेवे यांनी केले. आभार सत्यवान माने यांनी मानले. कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख दत्तकुमार खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सातारा, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शंभूराज खलाटे, सातारा जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष संतोष पवार, नरेंद्र झहीर, रवि शिंदे, ऍड. तानाजी जाधव, सत्यवान माने, रामभैय्या शिंदे, महेश जगदाळे, भरत कांबळे, अमोल चौगुले, संजय कडोले, संतोष कदम, सागर व्हनकाळे, महेंद्र कदम, सुरेश भिंगारदेवे, सुशांत पाटील, किरण माने, नितीनराजे जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.