प्रतिनिधी /वास्को
दाबोळी मतदारसंघात तृणमुल काँग्रेसने प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल बुधवारी पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत तृणभुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात दाबोळी काँग्रेसचे गट अध्यक्ष महेश भंडारी याचाही समावेश आहे. तृणमुल काँग्रेसचे खासदार डॉ. शंतनु सेन व माजी आमदार तसेच सध्या तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले लवू मामलेदार यांनी त्यांचे या पक्षात स्वागत केले.
वास्कोत बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात महेश भंडारी यांच्यासह मनोहर भंडारी, शुभम तिळोजी, विजय इत्यादी, नशिर शिरगावकर, सज्जन कमार, संदेश तळेकर, आत्माराम शेटकर, सतिष शिंत्रे, संजू बडी, कुमार बातीला, हनुमंता कुलबर्गी या कार्यकर्त्यांना तृणभुल काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे तृणमुल काँग्रेसमध्ये स्वागत करताना खासदार डॉ. शंतनु सेन म्हणाले की, गोव्यात भाजपा सरकार सर्व पातळय़ांवर सपशेल अपयशी ठरलेले असून गोव्याला चांगले कार्य करणाऱया सरकारची गरज आहे. गोव्यातील जनतेला तृणमुल काँग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमध्ये गेली दहा वर्षे चालवलेल्या कामाची जाणीव आहे. त्यामुळे गोव्यातील लोक तृणमुल काँग्रेसकडे वळु लागलेले आहे. 34 वर्षे सतत राज्य केलेल्या कम्युनिष्ठ पक्षाकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्ता खेचून घेतली होती. त्यानंतर त्यांनी लोकांसाठी चांगले कार्य केलेले आहे. गोव्यातील लोकांनाही असाच पर्याय हवा आहे. तृणमुल काँग्रेस केवळ बंगालचा राजकीय पक्ष नसून तो राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्तरावर या पक्षाला तिसरे स्थान आहे असे खासदार शंतनु म्हणाले.
माजी आमदार लवू मामलेदार यांनी गोव्यात तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश करू ईच्छीणाऱया लोकांचा ओघ वाढू लागल्याचे सांगितले. गोव्यातील प्रत्येक मतदारसंघात तृणमुल काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असून येणाऱया दिवसांत अनेक नेते व कार्यकर्ते या पक्षात सामील होतील. मात्र, तृणमुल काँग्रेस पक्ष केवळ योग्य अशा व्यक्तीनाच उमेदवारी बहाल करील असे मामलेदार म्हणाले. गोव्यात सध्या जे काही राजकारण चाललेले आहे, ते लोकांना मान्य नाही. काँग्रेस आणि भाजपाच्या सरकारांनी लोकांचा अपेक्षा भंग केलेला आहे. दोन्ही पक्ष अयशस्वी ठरलेले आहेत. त्यामुळे गोव्यातील लोकांना तृणमुल काँग्रेस हाच योग्य पर्याय वाटू लागल्याचे मामलेदार म्हणाले. यावेळी महेश भंडारी यांनीही काँग्रेसकडून युवा वर्गाला योग्य सहकार्य मिळत नसल्यानेच आपल्याला तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश करावा लागल्याचे स्पष्ट केले.