आम्हा सर्व सहकाऱ्यांवर प्रभाव शिखर धवनचाच!
भले शिखर धवन दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार नसेल. पण, या संघावर प्रभाव आहे, पडद्यामागील या संघाचा सूत्रधार आहे तो दस्तुरखुद्ध धवनच! आणि हे मत आहे या संघातील ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टोईनिसचे! दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली असताना या प्रवासाचा स्टोईनिस महत्त्वाचा साक्षीदार ठरला आहे.
या मोसमात दिल्ली कॅपिटल्ससाठी धवनने 603 धावांची आतषबाजी केली तर स्टोईनिसने 352 धावा व 12 बळी, असे अष्टपैलू योगदान दिले. रविवारी दिल्लीने सनरायजर्स हैदराबाद संघाचा 17 धावांनी धुव्वा उडवला, त्यातही या उभयतांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
‘शिखरचे योगदान अविश्वसनीय स्वरुपाचे राहिले आहे आणि त्याने काही तडाखेबंद शतके देखील झळकावली आहेत. ज्या सामन्यात तो अशी खेळी साकारु शकला नाही, त्यातही त्याने बिनचूक फटके लगावले आहेत. यंदाच्या मोसमात त्याचे योगदान निश्चितच लक्षवेधी आहे’, असे स्टोईनिस पुढे म्हणतो.
‘धवन आमच्यासाठी पडद्यामागील कर्णधार आहे. तो तटस्थ असतो. पण, संघात तो जो उर्जा आणतो, त्याला तोड नाही. या पूर्ण वाटचालीत त्याचे योगदान आमच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरले. या हंगामात त्याने 600 पेक्षा अधिक धावांची आतषबाजी केली आहे आणि कदाचित त्याची आणखी एक मोठी खेळी बाकी आहे’, याचाही स्टोईनिसने पुढे उल्लेख केला. स्वतः स्टोईनिसने रविवारच्या लढतीत 38 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
स्टोईनिसने यापूर्वी बिग बॅश लीगमध्ये सलामीला फलंदाजी केली होती. पण, यंदा आयपीएलमध्ये त्याला सलामीला उतरण्याची प्रथमच संधी मिळाली. युवा सलामीवीर पृथ्वी शॉ सातत्याने अपयशी ठरत असताना त्याला आणखी संधी देण्यात व्यवस्थापनाने कसर सोडली नाही. मात्र, यानंतरही तो अगदी दुहेरी धावसंख्याही गाठू शकत नव्हता आणि महत्त्वाच्या क्वॉलिफायर लढतीत दिल्ली व्यवस्थापनाने त्याला वगळत स्टोईनिसला संधी दिली आणि हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
‘प्रशिक्षक रिकी पाँटिंगने मला सलामीला फलंदाजीला पाठवले जाऊ शकते, याची कल्पना दिली होती. त्यामुळे, माझी मनोमन त्यासाठी तयारी होती आणि ज्यावेळी संधी मिळाली, त्यावेळी मी त्याचे संघासाठी सोने करु शकलो’, याचा स्टोईनिसने येथे उल्लेख केला.
ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजीत देखील मनीष पांडे व केन विल्यम्सनसारखे मोहरे गारद करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. या अनुभवाबद्दल तो म्हणाला, ‘टी-20 सारख्या जलद क्रिकेट प्रकारात काटेकोर, भेदक मारा साकारणे अतिशय आव्हानात्मक असते. प्रतिस्पर्धी फलंदाज प्रत्येक चेंडूचा समाचार घेण्याच्या मानसिकतेत असतो, त्यावेळी हे आणखी कठीण होते. पण, अशा स्थितीतच फलंदाज चुका करु शकतात आणि ते आपण हेरायला हवे. माझ्या मते लढतीसाठी मैदानात प्रत्यक्ष उतरण्यापूर्वी योग्य रणनीती आखायला हवी आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी कशी करता येईल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे’.