विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह आहाराचे पैसे होणार बँकेत जमा : बँक खाते उघडण्यासाठी पालकांची तारेवरची कसरत
प्रतिनिधी /बेळगाव
लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतील मध्यान्ह आहार मिळाला नाही. त्यामुळे मध्यान्ह आहाराचे हे पैसे प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. परंतु यासाठी विद्यार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. दीडशे ते दोनशे रुपयांसाठी एक हजार ते पंधराशे रुपयांचे खाते काढण्याची वेळ पालकांवर आली आहे. आधीच कोरोनामुळे उद्योगधंदे ठप्प असताना त्यातच खाते काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने शाळा बंद करण्यात आल्या. यामुळे मध्यान्ह आहारदेखील बंद झाला होता. त्यामुळे सरकारने मध्यान्ह आहाराचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
50 दिवसांचे पैसे देण्यात येणार
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आहारानुसार पैसे खात्यात जमा केले जाणार आहेत. एकूण 50 दिवसांच्या आहाराचे पैसे देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना शून्य रुपये खाते काढण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. किती पैसे खात्यात जमा होणार याबाबत अद्याप निश्चिती नसली तरी लवकरच ते जमा होतील, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात येत आहे.
दिवसाचा रोजगारही बुडीत
झिरो बॅलन्स खाते उघडण्याचे शिक्षण विभागाने आदेश दिले असले तरी बॅंका मात्र हजार ते दीड हजार रुपये भरून खाते काढून देत आहेत. बॅंकांमध्ये आधीच गर्दी असताना त्यात आता लहान मुलांची खाती काढण्यासाठी पालकांची गर्दी होऊ लागली आहे. दिवसभर थांबून पालकांना खाते काढावे लागत असल्याने दिवसाचा रोजगारही बुडत आहे. त्यामुळे मध्यान्ह आहाराचे पैसे किती जमा होणार याबाबत माहिती नसली तरी पालकांचे हजार ते पंधराशे रुपये मात्र बँकेमध्ये अडकून पडत आहेत.
कागदपत्रांसाठी हेलपाटे…
बँकांमध्ये खाते उघडणे म्हणजे किती मोठे दिव्य आहे, हे त्याच व्यक्तीला समजू शकते. काही बँकांनी ऑनलाईन खाते काढण्यास सुरुवात केली असली तरी ग्रामीण भागात बँकांमध्ये जावूनच खाते उघडावे लागत आहे. शाळा व बँका असे हेलपाटे पालकांना मारावे लागत आहेत. केवळ विद्यार्थ्यांची कागदपत्रे नाही तर आई-वडिलांचे पॅनकार्ड, आधारकार्ड देखील आवश्यक असल्याने पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.