वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांची मागणी : शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीला बंद केल्याने समस्या
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील सर्व मुख्य रस्त्यांच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. बाजारपेठेतदेखील प्रत्येक रस्त्यावर बॅरिकेड्स लावून प्रवेशद्वार बंद केले आहे. काही चौकात दोन्ही बाजूंचा रस्ता बंद करण्यात आल्याने रुग्णांसह अत्यावश्यक सेवा देणाऱया वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत रस्ते खुले ठेवण्यात यावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्लोजडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मास्क वापरा, सामाजिक अंतर राखा, असे आवाहन करूनही नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. तसेच राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने क्लोजडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. शहरात अनावश्यक फिरणाऱयांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील बहुतांश रस्ते एका बाजूने बंद ठेवले असून काही ठिकाणी दुसऱया बाजूचा रस्ता वाहतुकीकरिता खुला ठेवला आहे.
पण बाजारपेठेत जाणाऱया रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. परिणामी दुचाकी, चारचाकी वाहने व सायकलस्वारांनाही ये-जा करणे मुश्कील बनले आहे. काही ठिकाणी पादचाऱयांनादेखील ये-जा करता येत नाही. अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी सध्या दुपारी 12 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. भाजी विक्री, दूध विक्री केंद्रे, फळे आणि किराणा दुकान आदींसह काही औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांना मुभा देण्यात आली आहे. पण रस्ते बंद ठेवण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आल्याने वळसा घालून जावे लागत आहे. परिणामी वेळ आणि इंधन वाया जात आहे. त्यामुळे किमान सकाळी 6 ते दुपारी 12 यावेळेत काही रस्ते खुले करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
दुपारी 12 वाजल्यानंतर सर्व व्यवसाय बंद करण्याकरिता पोलीस-प्रशासकीय अधिकारी बाजारपेठेत फेरफटका मारून व्यावसायिकांना सूचना करीत आहेत. तसेच अनावश्यक फिरणाऱया नागरिकांना चाप लावण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून अडचणी निर्माण करण्यात आल्या आहेत. पण याचा फटका अत्यावश्यक सेवा देणाऱया वाहनांना तसेच रुग्ण, सरकारी व खासगी कार्यालयात सेवा बजाविणाऱया कामगारांना होत आहे. शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना पर्यायी रस्त्यांचा अवलंब करावा लागत आहे. चन्नम्मा सर्कल, राजेंद्र प्रसाद चौक, गोगटे चौक, बसवेश्वर चौक, शहापूर येथील बॅ. नाथ पै चौक, किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली कॉर्नर, खडेबाजार, राणी चन्नम्मा चौक अशा विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. काही रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून केवळ एकच वाहन जाईल इतका रस्ता मोकळा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
बॅरिकेड्स लावण्यात आलेल्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. नागरिकांची वर्दळ कमी झाली असली तरी औद्योगिक वसाहत, बांधकाम व्यावसायिकांना मुभा देण्यात आली आहे. तसेच वाहतूक सुरू ठेवण्याची मुभाही देण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम साहित्य, तसेच धान्य, भाजीपाला व इतर साहित्य ने-आण करणारी वाहने शहरात येत आहेत. परिणामी बॅरिकेड्स लावण्यात आलेल्या ठिकाणी गर्दी होत आहे.
रुग्णवाहिका-अत्यावश्यक सेवा देणाऱया वाहनांना फटका
संगोळ्ळी रायण्णा चौकातून राणी चन्नम्मा चौकाकडे जाणाऱया दोन्ही रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. तसेच वाहनधारकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने कोल्हापूर सर्कलमार्गे जाण्याची सूचना करण्यात येत आहे. अन्य रस्ते एका बाजूने खुले असताना हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. विशेषतः रुग्णांना आणि अत्यावश्यक सेवा देणाऱया रुग्णवाहिका आणि वाहनांना फटका बसत आहे. त्यामुळे हा रस्ता खुला ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याबाबत पोलीस आयुक्त त्यागराजन यांना विचारले असता, येथील रस्ता खुला करण्यात आला आहे, अशी माहिती दिली. पण सदर रस्ता केवळ मंगळवारी खुला ठेवण्यात आला. बुधवारपासून पुन्हा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयात जाणाऱया रुग्णवाहिकांना देखील कोल्हापूर सर्कलमार्गे वळसा घालून जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.