प्रतिनिधी / सातारा :
दुर्गम भागात पोलीस वसाहत निर्माण करण्यासाठी त्वरित प्रस्ताव सादर करा, असे निर्देश आज गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. देसाई म्हणाले, दुर्गम भागांतील पोलिसांसाठी कामकाजाच्या ठिकाणी नजीक राहण्यासाठी घर असणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस विभागाने दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांसाठी पोलीस वसाहत बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करुन सादर करावा. त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन देसाई यांनी यावेळी दिले. तसेच पोलीस स्टेशन उभारणीबाबतचाही प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
येत्या 5 ऑक्टोबरपासून शाळा व महाविद्यालये सुरु होत आहेत. त्यादृष्टीने विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी महिला पथदर्शी प्रकल्पामधून बंदोबस्त ठेवावा. यावेळी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण शाळेतील विद्यार्थींनींच्या स्वसंरक्षणासाठी प्रत्येक तालुक्यासाठी किमान 10 तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच समाज कल्याण विभागाने आश्रमशाळेतील मुलींनाही स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.