आज कार्तिक शुद्ध एकादशी आहे. आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीसुद्धा वैष्णवांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पंढरपूर हे असे एकमेव तीर्थक्षेत्र आहे, जिथे वर्षातून चार वेळा यात्रा होते. या यात्रा वर्षातून येणाऱया 4 मुख्य एकादशीच्या दिवशी भरतात. चैत्र यात्रा, आषाढी यात्रा, कार्तिक यात्रा, आणि माघी यात्रा या दिवशी साधुसंतांच्या आगमनाने पंढरपूर उत्साहाने फुलून गेलेले असते. हा आध्यात्मिक देवदुर्लभ सोहळा अतिशय अवर्णनीय असतो. आषाढ शुद्ध एकादशीला ‘शयन’, ‘देवशयनी’, ‘पद्मा’ किंवा विष्णुशयानी एकादशी या नावानेही ओळखले जाते. या एकादशीचे अधि÷ाता विठ्ठल (श्रीकृष्ण) आहेत. या दिवशी विठ्ठल भगवान शयन करतात. त्यानंतर कार्तिक एकादशीला भगवंत उठतात म्हणून या एकादशीला ‘उत्थान’ एकादशी म्हणून संबोधतात. या दोन्ही एकादशीमधील काळाला चतुर्मास म्हणतात. कार्तिक यात्रेनंतर चतुर्मास पूर्ण होतो. या कार्तिक यात्रेत चंद्रभागा नदीच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन करणारी मंडळी जमतात. हा उत्सव अत्यंत प्रेक्षणीय असतो. संध्याकाळपासून संपूर्ण वाळवंट भाविकांनी फुलून जाते. वाळवंटात ठिकठिकाणी वेगवेगळय़ा दिंडय़ा, दिंडीप्रमुखांसह कीर्तन आणि प्रवचने करतात. एकादशीच्या रात्री कीर्तन आणि प्रवचन करीत जागरही केला जातो. संपूर्ण वाळवंट प्रकाशाने उजळून निघालेले असते. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपाळकाला होतो. या संपूर्ण उत्सवात लाखें लोक सहभागी होत असतात. या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने हे एक विशेष चिंतन.
या जगामध्ये कोणाकडे संपत्ती-पैसा नसेल, शिक्षण नसेल, प्रतिष्ठ ा नसेल अशा व्यक्ती अथवा केवळ जगण्यासाठी अत्यंत काबाडकष्ट करावे लागणाऱया व्यक्ती ज्यांच्याकडे एकवेळचे जेवण करण्यासाठीसुद्धा काही साधन नाही, नोकरी व्यवसाय नाही अशा व्यक्तीला सर्वसाधारणपणे दुर्दैवी समजले जाते. ज्याच्या जीवनात केवळ दुःखेच येतात अशा व्यक्तीला पण दुर्दैवी म्हटले जाते. दुर्दैवाच्या निरनिराळय़ा व्याख्या करता येतील पण संत तुकाराम महाराजांसारखे समाजाला मार्गदर्शन करणारे सर्वार्थाने ज्ञानी पुरुष जेव्हा दुर्दैवी व्यक्तीबद्दल बोलतात तेव्हा गरीब असो अथवा श्रीमंत असो मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावर आपले कर्तव्य जर पार पाडत नसू तर सर्वचजण दुर्दैवी आहेत. एका अभंगात या दुर्दैवी अवस्थेतून आपल्याला कायमचे बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करताना तुकाराम महाराज सांगतात विषयओढी भुलले जीव । आता याची कोण करील कींव ।। नुपजे नारायणी भाव । पावोनि ठाव नरदेह ।।1।। कोण सुख धरिलें संसारी । पडोनी काळाचे आहारी । माप या लागले शरीरी । झालियावरी सळे ओढती ।।2।। बापुडी होतील शेवटी । आयुष्यासवें झालीया तुटी ।। भोगील मागे पुढे ही कोटी । होईल भेटी जन्मासी ।।3।। जुंतिले घाणा बांधोनि डोळे । मागे जोडी आर तेणेंही पोळे ।। चालिलों किती ते न कळे । दुःखे आरंबळे भूक तहान ।।4।। एवढे जयाचे निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित ।। ते हे देह मानुनी अनित्य । न करिती कां नित्यनामस्मरण ।। 5।। तुका म्हणे न वेचता मोल । तो हा यासी महाग विठ्ठल ।। वेंचिता फुकाचे बोल । केवढे खोल अभागिया ।।6।। अर्थात विषयाच्या ओढीने सर्वजण भुलून गेले आहेत, त्यांची कींव कोण बरे करेल? मनुष्य देह लाभूनही यांच्या मनात नारायणाविषयी श्रद्धा नाही अशा या जीवांनी संसारात कशाचे बरे सुख मानले आहे? काळाच्या तोंडात हा जीव सापडला आहे. आयुष्याचे मोजमाप पूर्ण झाले की, यमदूत फास टाकून यांना ओढून घेऊन जातात. मृत्यू आला की हे खूप दीन होतात परंतु तेव्हा केवळ पश्चाताप करण्याशिवाय कोणताच मार्ग नसतो. आतापर्यंत अनेक दुःखे भोगून पुढेही दुःखे भोगतात. मृत्यूनंतर त्यांना कर्मानुसार पुढील जन्म प्राप्त होत असतो. ज्याप्रमाणे बैलाला घाण्याला जुंपला जातो आणि त्यांच्या डोळय़ावर पट्टी बांधली जाते, बैल थोडा जरी थांबला तरी त्याला दाभण टोचले जाते, त्यामुळे त्याला अतिशय त्रास होतो. आपण किती चाललो आहोत हे त्याला कळत नाही आणि तहान भुकेने तो व्याकुळ होतो. त्याप्रमाणे इंद्रियतृप्तीत गुंतलेल्या लोकांची स्थिती होते. या जगात कर्मनियमानुसार सर्व काही चालते. हा कर्मसिद्धांत समजून लोक नाशवंत देहाला अनित्य मानून भगवंताचे दिव्य नामस्मरण का करीत नाहीत? पांडुरंगाचे नाव घेण्यासाठी एक पैसादेखील खर्च होत नाही पण लोकांना विठ्ठल चिंतन किती दुर्लभ झाले आहे. फुकटचे विठ्ठल नाम हे सर्व दुःखातून आपले कायमचे निवारण करते. या अभंगात सामान्य लोकांची तुलना वेसण बांधलेल्या बैलाशी केली आहे. बैल ज्याप्रमाणे वेसणीची दोरी मालकाच्या हातात असल्या कारणाने अनिच्छेने सर्व वेदना सहन करत अखंड कष्ट करत राहतो त्याप्रमाणे सामान्यजनही प्रकृतीच्या नियंत्रणाखाली कर्मबंधनाच्या अदृश्य दोरीने बांधला गेलेला जीवात्मा या जगात दुःख भोगत राहतो. निरनिराळय़ा भौतिक इंद्रियतृप्तीच्या इच्छा जीवात्म्याला प्रकृतीच्या नियंत्रणाखाली बैलासारख्या जखडून ठेवतात. अशा अनियंत्रित इच्छामुळेच आपले मन भगवंताकडे आकर्षित होत नाही. भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ.गी. 2.44) भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् । व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते । अर्थात ‘जे लोक इंद्रियतृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढनिश्चय होऊ शकत नाही.’ ज्याचे मन कायम कोणत्या ना कोणत्या इच्छा तृप्त करण्याच्या मागे लागले आहे ते मन कधीच समाधानी असू शकत नाही. कारण या मनावर अज्ञानाचे आवरण आले आहे. ते आवरण दूर केल्याशिवाय मन स्वहित कशामध्ये आहे हेही जाणू शकत नाही. या अभंगात म्हटल्याप्रमाणे केवळ भगवन्नामच मनाला अज्ञानाच्या म्हणजे मायेच्या प्रभावातून मुक्त करू शकते. स्वतः भगवान श्रीकृष्णच हा मार्ग आपल्याला सांगत आहेत ( भ.गी. 7.14) दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्तिते ।अर्थात तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुन पलीकडे जातात. हा अभंग आणि श्लोक स्पष्ट करतो की भगवान श्रीकृष्णाला शरण जाणे हा अज्ञानाच्या पर्यायाने मायेच्या प्रबळ प्रभावातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शरणागतीची सुरुवात भगवान्नामाने होते. यासाठी काहीही पैसा खर्च करावा लागत नाही. आज कलियुगाच्या प्रभावाने लोक पैसे खर्च करून अनेक वस्तू जमा करतात, त्याचा उपभोग घेण्यासाठी आपला दुर्लभ मानवी देह वाया घालवतात. अपार कष्ट करून मिळविलेला एवढा पैसा खर्च करूनही लोक असमाधानी, त्रस्त, दुखी, अनेक रोगांनी ग्रासलेले आहेत, तरीही ह्या सर्वातून बाहेर पडण्याची त्यांना इच्छा होत नाही ह्याबद्दल वैष्णवांना दुःख होणे साहजिकच आहे. त्यासाठी अत्यंत कळवळीने तुकाराम महाराज ह्या अभंगात सांगत आहेत, एक पैसाही खर्च न करता ज्या सनातन सुखाच्या शोधात आपण आहोत ते सुख भगवन्नामामध्ये आहे. हा सहजसोपा सुखाचा मार्ग सर्वासाठी उपलब्ध असणारा मार्ग जे स्वीकारीत नाहीत त्यासारखी दुर्दैवी व्यक्ती कोणी नाही.
-वृंदावनदास