वृत्तसंस्था/ मुंबई
शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया दुसऱया वनडेसाठी यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला अनफिट ठरविण्यात आले असल्याने तो या सामन्यात भाग घेऊ शकणार नाही. पहिल्या सामन्यावेळी कमिन्सचा बाऊन्सर हेल्मेटला लागल्याने तो जखमी झाला होता. या दुखापतीतून तो अद्याप सावरला नसल्याने त्याला या सामन्यातूत बाहेर ठेवण्यात आले आहे.
भारतीय संघ बुधवारी राजकोटमध्ये दाखल झाला आहे. मात्र पंत संघासोबत गेला नसून दुखापत पुनर्वसन प्रक्रियेसाठी तो बेंगळूरला रवाना झाला आहे. डोक्याला इजा झाल्यास पुनर्वसन प्रक्रियेसाठी नियमानुसार पाठविले जाते. आयसीसीने कन्कशन नियमावली लागू केल्यापासून एखादा खेळाडू अनफिट ठरविला जाणारा पंत हा भारताचा पहिला खेळाडू आहे. ‘दुसऱया सामन्यात खेळण्यास तो अनफिट ठरला असून पुनर्वसन प्रक्रियेनंतर त्याचा आढावा घेतल्यानंतर त्याची तिसऱया सामन्यासाठीची उपलब्धता ठरविण्यात येईल,’ असे बीसीसीआयने सांगितले.
मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यावेळी फलंदाजी करताना पंतच्या हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर त्याला भोवळ आली होती. याच चेंडूवर तो बादही झाला होता. मात्र नंतर तो क्षेत्ररक्षणास उतरला नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी केएल राहुलने यष्टिरक्षण केले होते आणि मनीष पांडे क्षेत्ररक्षणास उतरला होता. दक्षता म्हणून त्याला तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ‘त्याची प्रकृती स्थिर असून स्कॅन तपासणीत कोणतीही गंभीर इजा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून बेंगळूरमध्यी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुढील प्रक्रियेसाठी रवाना झाला आहे,’ असे बीसीसीआयने म्हटले आहे. तिसरा सामना बेंगळूरमध्येच होणार आहे. त्यामुळे पंतच्या पुढील 72 तासातील शारीरिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.