भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांचा आरोप
वार्ताहर / देवगड:
जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत हे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान कार्यक्रमासाठी शेकडो कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन कार्यक्रम करतात. एकीकडे कोरोनाच्या काळात व्यापारी वर्गाला व सर्वसामान्य जनतेला कोविड टेस्टसाठी व त्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी वेठीस धरले जाते. त्यांना एकप्रकारे छळण्याचा प्रकार केला जात आहे. मात्र, पालकमंत्रीच कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. देवगड तालुक्यात कोरोनाच्या नियंत्रणाबाबत पालकमंत्री पूर्णतः अपयशी ठरले आहेत, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केला आहे.
पालकमंत्री सामंत यांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी देवगड तालुक्यात कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. एकीकडे व्यापारी वर्गाला व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरावे व दुसरीकडे आपण खुलेआमपणे एका प्रशस्त सभागृहात कार्यकर्ते जमा करून अभियानाचे कार्यक्रम राबवावेत. यातून कोरोना नियंत्रणाचा नियम पाळला जात आहे काय? देवगडमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारणार, असे सामंत यांनी जाहीर केले होते. कोरोनाच्याबाबतीत पालकमंत्री ठोस निर्णय घेण्यात अपयशी ठरले आहेत. ‘बोलाची कढी, बोलाचा भात’ अशीच त्यांची स्थिती असल्याचा टोलाही किंजवडेकर यांनी लगावला आहे.
ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटर धूळखात
देवगड ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्र्यांनी दोन व्हेंटिलेटर दिले आहेत. या व्हेंटीलेटरसाठी फिजिशीयन सर्जनची आवश्यकता असते. देवगड रुग्णालयात फिजिशीयनच नसल्यामुळे ही यंत्रणा चालवणार कशी? मोठा गाजावजा करून देण्यात आलेले हे व्हेंटिलेटर बंदावस्थेत आहेत. त्याउलट हे व्हेंटिलेटर जिल्हा रूग्णालयात दिले असते, तर देवगड तालुक्यातील दोन रुग्णांसाठी ते उपयोगात आले असते. आता ही यंत्रणा धूळखात पडली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पालकमंत्र्यांना जनतेच्या आरोग्याचे देणे-घेणे नाही
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून देवगड येथील कोविड सेंटरला ऑक्सिजन प्लांट प्राप्त होणार आहेत. त्यासाठी अंतर्गत जोडणीचे काम सुरू आहे. पालकमंत्र्यांनी याची माहिती कार्यकर्त्यांकडून घेत हे काम कसे बंद पाडता येईल, याची योजना आखली आहे. यावरून येथील शिवसैनिकाला किंवा पालकमंत्र्याला जनतेच्या आरोग्याबाबत काहीच देणे-घेणे नसल्यासारखे दिसत आहे, असेही किंजवडेकर यांनी म्हटले आहे.