उदय सामंत यांचे मत : जामसंडे येथे ‘शिवसंपर्क’ अभियान
प्रतिनिधी / देवगड:
शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान हे केवळ पक्ष संघटना वाढीसाठी नसेल तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणारे असेल. या अभियानात मुख्यमंत्र्यांचे काम, आघाडी सरकारने केलेली कामे ही जनतेला सांगतानाच प्रत्येक घरात कोविड लसीकरण झाले आहे का? कोणाचे लसीकरण व्हायचे आहे? कोणत्या आरोग्य सेवेची गरज आहे, याची माहिती शिवसैनिक गोळा करतील. पक्ष वाढविताना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते व जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जामसंडे सांस्कृतिक भवन येथे देवगड तालुका शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख बुवा तारी, रवींद्र जोगल, माजी तालुकाप्रमुख ऍड. प्रसाद करंदीकर, जि. प. सदस्या सौ. वर्षा पवार, महिला तालुकाप्रमुख सौ. पूर्वा सावंत, वाडा सरपंच सुनील जाधव, माजी उपसभापती संजय देवरुखकर आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोरोना काळात सर्वात चांगले काम त्यांनी केले आहे. त्यामुळे 13 राज्यांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे काही लोकांना पोटसूळ उठले आहेत. देशातील जनतेने या सर्वेक्षणातून उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावे, असे मत व्यक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले.
नीट परीक्षा केंद्रासाठी फुकाचे श्रेय
सिंधुदुर्ग जिल्हय़ात नीट परीक्षा सेंटर मंजूर झाले आहे. याचे श्रेय काही लोक घेत आहेत. मात्र, हे सेंटर केंद्रीय मंत्री झाल्यानंतर लगेच मंजूर होत नाही. यासाठी देश व राज्याचा सर्व्हे केला जातो. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून एका पोलीस अधिकाऱयाने यासाठी प्रयत्न केले असल्याचे सामंत यांनी सांगितले.
युती, आघाडीचा निर्णय उद्धव ठाकरेंचाच
जिल्हय़ात सध्या कोणाबरोबर युती होणार? आघाडी होणार? अशा चर्चा रंगविल्या जात आहेत. मात्र, युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय हा फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आहे. या केवळ वावडय़ा आहेत. शिवसैनिकांनी याकडे लक्ष देऊ नये. शिवसैनिकांनी येत्या 12 दिवसांमध्ये शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजे. माणूस घडविण्याचे व माणुसकी जपण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मात्र, काही लोक आता माणुसकी विसरत चालले आहेत, अशी टीकाही सामंत यांनी विरोधकांवर केली.
न. पं., पं. स. तील भ्रष्टाचारामुळे जनता त्रस्त
तालुकाप्रमुख साळसकर यांनी पालकमंत्र्यांसमोर तालुक्यातील समस्या मांडत तालुक्यातील विकासकामांसाठी कोविडचा काळ संपल्यानंतर आमसभा घ्यावी. या मतदारसंघात विरोधी पक्षाचा आमदार असून त्यांचा विकासकामांकडे लक्ष नाही. देवगडची 54 कोटीची नळयोजना, नऊ गावांसाठीची चार कोटीची नळयोजना रखडल्या आहेत. देवगड-जामसंडे नगरपंचायत व देवगड पंचायत समितीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळे या विषयांकडे आपण लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सतीश सावंत, ऍड. करंदीकर यांनी मनोगत व्यक्त केले.