निडसोशी मठाधीशांकडून वीरेश हिरेमठ यांचे कौतुक
प्रतिनिधी/ बेळगाव
देशातील सुशिक्षित तरुण पैशाच्या मागे धावत सुटले आहेत. धर्म आणि राष्ट्र उभारणीत यामुळे अडथळे येत आहेत. अशा काळातही वीरेश हिरेमठ यांनी सामाजिक बांधिलकी ओळखून हिंदू देवदेवतांची विटंबना होऊ नये म्हणून राबविलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे, असे निडसोशी सिद्ध संस्थान मठाचे जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते आणि विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे जनसंपर्क प्रमुख वीरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली सर्वजन लोकसेवा फौंडेशनतर्फे संकेश्वरजवळ असलेल्या कमतनूर येथे रविवारी देवदेवतांच्या भग्न प्रतिमा संकलित करण्यात आल्या. एका दिवसात जवळ जवळ 11 पोती प्रतिमा जमविण्यात आल्या आहेत.
या उपक्रमानंतर वीरेश व त्यांच्या सहकाऱयांनी निडसोशी मठाधीशांची भेट घेतली. त्यावेळी स्वामीजींनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षण पद्धती दिशाहीन झाली आहे. सुशिक्षित तरुण पैशाच्या मागे लागले आहेत. अशा परिस्थितीत धर्म, संस्कृती रक्षणाबरोबरच राष्ट्र उभारणीचे काम महत्त्वाचे ठरते, असेही स्वामीजींनी सांगितले.
देवदेवतांची प्रतिमा कुठेही फेकून त्यांचा अपमान करू नये. त्यांचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. नागरिकांनी टाकलेली भग्न प्रतिमा गोळा करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून या उपक्रमाला आपला पाठिंबा राहील, असे स्वामीजींनी सांगितले. या उपक्रमात बाळू कणबरकर, महेश पाटील, शिवमूर्ती बुर्लकट्टी, निंगय्या बुर्लकट्टी, करण भोसले, मौलाना गोकाक यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही भाग घेतला.