वार्ताहर/ सांबरा
निलजी ते पंढरपूर पायी दिंडी रविवारी निलजी येथून मार्गस्थ झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व मंदिरातील प्रवेश बंद झाले. त्यामुळे निलजी येथील भाविकांना सुद्धा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी करता आली नाही. पण या मराठी वर्षात ही वारी पूर्ण व्हावी, यात खंड पडू नये म्हणून निलजी येथील दोन भाविक रविवारी पंढरपूरकडे रवाना झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात व विठूरायाच्या भजनात या दोन भाविकांना पायी वारीसाठी रवाना केले. 1958 पासून आजतागायत गेली 62 वर्षे ही पायी दिंडी विठूरायाला साद घालण्यासाठी पंढरपूरला जात असते. हभप कै. बाळाराम महाराज यांनी सुरू केलेल्या या पायी दिंडी वारीला दरवर्षी अनेक भक्त पायी चालत जाऊन विठूरायाचे दर्शन घेतात. हभप चंद्रकांत पाटील व भरमा इराप्पा पाटील-पाडसकर यांनी वयाची पर्वा न करता आज पंढरपूरकडे कूच केली. आठवडाभर यांचा हा पायी प्रवास चालणार आहे. निलजी गावातील सर्व मंदिरांना पुष्प अभिषेक करून गावातील श्रीराम भजनी मंडळाने गावच्या वेशीपर्यंत या दोन भक्तांना घेऊन भजन, कीर्तन करत पंढरपूरकडे मार्गस्थ केले.