पट्टेरी वाघ हा आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी असून, त्याचाही रूबाब आणि देखणेपणाबाबत समाजात पूर्वापार औत्सुक्य आहे. एकेकाळी वाघाची शिकार करणे हे शौर्यवंतांच्या कर्तृत्वाशी जोडले गेले होते आणि त्यामुळे वाघांना ज्या व्यक्तीने जास्तीत जास्त संख्येने मारलेले आहे, त्यांच्याविषयी आदरभाव असायचा. आपल्याकडच्या राजेसरदारांचा वाघांसारख्या प्राण्याची शिकार करणे हा शौक मानला गेला होता. महाराष्ट्र, कर्नाटकातल्या संस्थानिकांनी वाघांच्या शिकारी करण्यात धन्यता मानली होती. कोल्हापूर जिल्हय़ातल्या दाजीपूर, राधानगरीसारख्या जंगलात वाघांचा वावर होता. परंतु संस्थानिकांनी अन्य जंगली श्वापदांबरोबर वाघांच्या शिकारींना प्रतिष्ठेचे लक्षण मानले होते. शेकडो वाघांची शिकार करणारे जिम कार्बेट, कॅनेथ अंडरसनसारख्यांना बऱयाचदा नरभक्षक वाघांची शिकार करण्यासाठी पाचारण केले जायचे. परंतु काही काहीवेळा नरभक्षक नसलेल्या वाघांनाही ठार मारण्याची परिस्थिती उद्भवलेली होती. गोव्यासारख्या छोटय़ा राज्यातल्या सरदार संस्थानिकांनीही इथल्या जंगलातल्या वाघांची निर्घृणपणे शिकार करून त्यांच्या अस्तित्वावर घाला घातलेला आहे.
आज आपल्या देशात 1972 सालचा वन्यजीव संरक्षण कायदा लागू असून, त्यात कायद्याने पट्टेरी वाघाची शिकार करण्याला बंदी घातलेली आहे. याप्रकरणी गुंतलेल्या गुन्हेगाराला कडक शिक्षेची तरतूद केलेली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा लागू झालेला असताना, आजही पट्टेरी वाघांची सर्रास हत्या केली जात असून, अपवादात्मक प्रकरणी एखाद्याला शिक्षेला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. याला व्याघ्र मृत्यूची कारणमीमांसा प्रकाशात येण्यास तपास यंत्रणेतल्या बऱयाच त्रुटी कारणीभूत ठरलेल्या आहेत. सध्या सहय़ाद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गोव्यातल्या सत्तरी तालुक्यातल्या गोळावलीच्या जंगलातील चार वाघांच्या विषप्रयोगाद्वारे करण्यात आलेल्या हत्येचे प्रकरण उघडकीस आलेले आहे. या चार मृत्यूमुखी पडलेल्या वाघांच्या मृतदेहांचे कुजलेल्या स्थितीत शवविच्छेदन करण्यात आलेले आहे. त्यांचा मृत्यू विषप्रयोगाने झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे कुजलेले कलेवर पुरण्यात आणि उघडय़ावर ठेवण्यात आले होते. याप्रकरणी विषप्रयोग करण्यात आला असल्याचे, धनगर समाजातील संशयित पावणे कुटुंबीयांनी मान्य केले असले तरी मेलेल्या वाघांचे जे अवयव चिकित्सेसाठी हैदराबाद, डेहराडून येथे पाठविण्यात आलेले आहेत, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर व्याघ्र हत्येच्या बऱयाच कारणांवर प्रकाशझोत पडणार आहे.
2009 साली सत्तरीतील केरी गावात एका वाघाची सापळय़ात अडकल्यावर गोळी घालून करण्यात आलेली हत्या आणि मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यातल्या संशयितांना अटक केल्यानंतर त्यांनी आपला कबुलीजबाब दिला होता. परंतु सध्या या प्रकरणात गुंतलेल्या गुन्हेगारांऐवजी चौकशी करणाऱया वन अधिकाऱयांवरच कारवाई होण्याची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्यामुळे वनखात्याचे धाबे दणाणले आहे. या पार्श्वभूमीवर गोळावली व्याघ्र हत्येत गुंतलेल्या याच संशयितांचे कबुलीजबाब नोंद करून, या प्रकरणाची चौकशी चालू झालेली आहे. चारही वाघांचे महत्वाचे अवयव नष्ट झाल्याने, विषप्रयोगाद्वारे त्यांच्या करण्यात आलेल्या हत्येमागची कारणे स्पष्ट करण्याचे मोठे आव्हान वन खात्यासमोर आहे. 2009 ते 2020 पर्यंत केवळ पाच वाघांच्या हत्येची प्रकरणे उघडकीस आलेली असली तरी या कालखंडात वाघांच्या झालेल्या हत्या, पुराव्यांचे समूळ उच्चाटन झाल्याने प्रकाशात आलेल्या नाहीत.
केवळ गोव्यातच नव्हे तर देशभर जेथे जेथे व्याघ्रहत्येची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत, तेथील व्याघ्र मृत्यूमागची कारणे स्पष्ट झालेली नाही आणि त्यामुळे अशा प्रकरणात गुंतलेले गुन्हेगार उजळमाथ्याने फिरत आहेत ही खेदजनक बाब आहे. भारतीय प्राणीसंग्रहालय संघटना आणि वन्यजीव व वैद्य यांनी देशभरात मृत्यूमुखी पडलेल्या वाघांच्या कारणमीमांसेचा चिकित्सकरित्या अभ्यास 2009 ते 2016 च्या कालखंडापर्यंत केला असता, त्यांच्या मृत्यूमागची कारणे स्पष्ट झालेली नाहीत.
अभ्यासातून उत्तर प्रदेशात यापूर्वी 28 वाघांचे जे मृत्यू वेगवेगळय़ा कारणांनी उद्भवलेले आहेत त्यातल्या नऊ वाघांच्या मृत्यूमागची कारणे अस्पष्ट आहेत. कर्नाटकात मृत्यू आलेल्या 86 वाघांपैकी 30 वाघांची प्रकरणे गुलदस्त्यात आहेत. महाराष्ट्रातल्या 73 पैकी 22, मध्य प्रदेशातल्या 137 पैकी 31, तामिळनाडूतील 40 पैकी 20, केरळातील 30 पैकी 11, उत्तराखंडातील 83 पैकी 9 आणि राजस्थानातील 15 पैकी 3 व्याघ्रमृत्यूमागची कारणे स्पष्ट झालेली नाहीत. विषबाधा, शिकार याद्वारे व्याघ्रमृत्यू उद्भवला तर बऱयाचदा वाघाचे शरीर कुजलेल्या दयनीय अवस्थेत पोहोचते आणि त्यामुळे वाघाचा मृत्यू विषप्रयोगाने झाला हे सिद्ध होणे कठीण बनते. शवविच्छेदन करण्यासाठी होणारा विलंबही मृत्यूमागची कारणे स्पष्ट होण्यात असंख्य अडचणी निर्माण करतात. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाद्वारे देशभरातल्या वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे प्रयत्न चालू असले तरीही यंत्रणा तोकडी पडत चालली आहे. आज पट्टेरी वाघांच्या हालचाली, स्थलांतर, नैसर्गिक अधिवासातला आणि वाघांच्या पारंपरिक मार्गावरचा संचार या संदर्भातले संशोधन आणि अभ्यासासाठी कॅमेरा ट्रप आणि रेडिओ कॉलर तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. परंतु या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातल्या त्रुटीमुळेही वाघांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.
गोळावली गावात वाघांनी जेव्हा डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवडय़ात तेथील पावणे कुटुंबाची गाय मारली तेव्हा म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्र अधिकाऱयाने त्यांची भेट घेऊन नुकसान भरपाई देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर काही दिवसांच्या आत वाघांनी म्हशीला ठार केले आणि त्यावेळीही अर्ध्या खाल्लेल्या म्हशीच्या मांसातून विषप्रयोग करू नये म्हणून वन अधिकाऱयाने विनविले होते. परंतु असे असताना केवळ दोन दिवसात विषप्रयोग करण्यात आला आणि त्यात चारही वाघांना मृत्यू आला. त्यांचे प्रकरण प्रकाशात यायला आणि शवविच्छेदनास बराच विलंब लागलेला आहे आणि त्यामुळे गोळावली व्याघ्रमृत्यूमागची कारणमीमांसा प्राप्त होणाऱया अहवालावर आणि या प्रकरणाची चौकशी निर्भीडपणे तसेच प्राप्त होणाऱया ठोस पुराव्यांवर अवलंबून राहणार आहे. त्यानंतरच गोळावली व्याघ्र हत्येमागची कारणे स्पष्ट होणार आहेत. देशभर वाघांच्या मृत्यूमागची कारणे प्रकाशात येत नाहीत, ही चिंतेची बाब आहे.