नवी दिल्ली/प्रतिनिधी
देशात दररोज ३ ते ३.५० लाख कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्ये बरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. देशातील कोरोना परिस्थिती कायम आहे. देशात आकडेवारीवरून रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं दिसत असलं, तरी अद्यापही देशात दररोज साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. तर मृतांची संख्याही चार हजारांच्या मागे पुढेचं सरकताना दिसत असून, देशातील कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं थैमान अद्याप कायम आहे. गेल्या २४ तासातील मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने ती एक देशाला दिलासा देणारी बाबा आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीमध्ये भारतात शुक्रवारी दिवसभरात तीन लाख २६ हजार ९८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आहे. तर तीन लाख ५३ हजार २९९ रुग्ण कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर मृत्यू संख्येच्या सरासरीत कोणतीही घट होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून दररोज चार हजारांच्या आसपास मृत्यूंची नोंद होत आहे. देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या दोन लाख ६६ हजार २०७ वर पोहोचली आहे. तर सध्या देशात ३६ लाख ७३ हजार ८०२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
देशात झालेल्या एकूण ३८९० मृत्यूंपैकी ६९५ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर कर्नाटकात ३७३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून, देशात कर्नाटक सर्वाधिक रुग्णसंख्येत अग्रस्थानी आहे. कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.