मनीषा सुभेदार/ बेळगाव
गुढी पाडव्यासारखा महत्त्वाचा आणि वर्षारंभाचा सण… पाडव्याला पंचपक्वान करण्याची प्रथा असल्याने दुकानदारांनी मिठाई तयार करून स्वीट मार्ट्स सज्ज केली. पण… कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू सुरू झाला. लगेच लॉकडाऊनची घोषणा झाली… आणि मिठाईची दुकाने बंद करणे भाग पडले… मिठाईचे करायचे काय, दुकानचालकांना प्रश्न पडला. सुज्ञपणे त्यांनी विविध खात्यातील कर्मचाऱयांना त्याशिवाय वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि झोपडपट्टीतील लोकांना मिठाई वितरित केली.
आज जनता कर्फ्यू लागू होऊन 15 दिवस उलटले. मिठाईच्या दुकानाचे चालक घरी आहेत. अर्थातच त्यांच्याकडे काम करणारे सर्वच कामगार घरी आहेत. एकीकडे अपरिमित नुकसान झाले. दुसरीकडे कामगारांचा पगार द्यावयाचा आहे. आपली स्थिती काही अंशी बरी आहे. याची जाणीव ठेवत कामगारांना पगार देण्यास सर्वांनी तयारी दर्शविली आहे. नुकसान झालेच आहे. परंतु देशाच्या सुरक्षिततेपुढे हे नुकसान सोसण्याची तयारी असल्याचे सर्वांनीच सांगितले.
मिठाई दुकानांचे चालक हे साधारण सधन वर्गातले असतात असे मानले जाते. काही अंशी ते खरे पण आहे. त्यांच्यापेक्षा इतर अनेक घटक आहेत. ज्यांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. परंतु म्हणून त्यांचे झालेले नुकसान सुद्धा विचारात घेण्यासारखेच आहे. दुर्दैवाने एखाद दोन तास त्यांना दुकान सुरू ठेवता येत नाही. त्यांच्यावर अवलंबून असणारे दूध उत्पादक आणि गवळी बांधव सुद्धा अडचणीतच आले आहेत. या सर्वांनी दुकानातील मिठाई वितरित केली. आणि दुकान बंद केले.
अंदाजे 6 लाखाहून अधिक नुकसान : अतुल पुरोहित
कॉलेज रोडवरील अतुल पुरोहित या स्वीट मार्टचे संचालक अतुल पुरोहित म्हणाले, पाडव्यासाठी नेहमीप्रमाणे ज्यादा मिठाई केली होती. रविवारीच जनता कर्फ्यू लागू झाला. तेव्हा अंदाज आलाच होता. परंतु पाडव्याला किमान खरेदी होईल अशी अपेक्षा होती. पण लॉकडाऊन जाहीर झाले आणि होती ती सर्व मिठाई वितरित करून टाकली. खवा, कलाकंद, चमचम असे पदार्थ चार दिवसांपेक्षा अधिक टिकू शकत नाहीत.
मिठाई आधी वितरित केली. त्यानंतर जे खारे पदार्थ आहेत. त्यांच्यावरील तारीख पाहून त्यांचेही वितरण केले. बऱयाच प्राण्यांना सुद्धा सध्या हे पदार्थ देत आहोत. अंदाजे 6 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. मिठाई जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत नाही. त्यामुळे आम्हाला काही तासासाठी दुकान उघडण्याची परवानगी नाही. फक्त बंगालमध्ये तेथील उत्सवामुळे चार ते पाच तास दुकान उघडण्याची परवानगी मिळाली होती. कामगार घरी असून त्यांचा पगार निश्चितच देणार आहे.
विक्रम पुरोहित
कॅम्पमध्ये कल्याणी स्वीटस् हे दुकान आहे. मिठाईमध्ये नावीण्य हे यांचे वैशिष्टय़ आहे. गुढी पाडव्यासाठी आपणही तयारी केली होती. परंतु कर्फ्यू आणि लॉकडाऊननंतर सर्व मिठाई सिव्हिल हॉस्पिटल व रेल्वे स्थानकावर नेऊन वाटप केले. आपल्याकडे या एकाच दुकानात 32 कामगार आहेत. त्यांना सध्या काम नाही. परंतु त्यांचा पगार सुरू आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था आपण करत असल्याचे विक्रम यांनी सांगितले.
वृद्धाश्रम व आनाथाश्रमाला मिठाई वितरित : रमेश ओझा
रेल्वे स्टेशनच्या आवारात ओझा यांचे प्रसाद स्वीट मार्ट आहे. कर्फ्यू आणि लॉकडाऊननंतर रवी साळुंखे यांच्या मदतीने त्यांनी वृद्धाश्रम, आनाथाश्रम आणि झोपडपट्टी येथे सर्व मिठाई वितरित केली. अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ते सांगतात. त्यांच्याकडे 14 कामगार आहेत. त्यांचा पगार देण्यास आपण बांधील असल्याचे त्यांनी सांगितले. मिठाईबरोबरच चहा आणि दूध सुद्धा ते देतात. रेल्वेस्थानक आणि बसस्थानक येथे येणाऱया प्रवाशांसाठी ही सोय त्यांनी केली आहे. परंतु सध्या सर्व काम ठप्प झाले आहे. जर परवानगी मिळाली तर किमान चहा, दूध तरी देता येईल, असे त्यांना वाटते.
कोरोनामुळे नुकसान सोसण्याची तयारी : धर्मेंद्र पुरोहित
पाडव्यानिमित्त भरपूर मिठाई तयारी केली होती. याशिवाय या दुकानात चॉकलेट, ड्रायपूटस, भेट देता येण्याजोगे पदार्थ, सीरफ, असे अनेक नमुने आहेत. अंदाजे 200 प्रकारचे पदार्थ याठिकाणी उपलब्ध असतात. मात्र, कर्फ्यू आणि लॉकडाऊननंतर त्यांनी सुद्धा सर्व गरीब वसतीमध्ये मिठाई वितरित केली. याशिवाय प्राणी बचाव संघटनांकडे सुद्धा काही पदार्थ पाठविल्याचे त्यांनी सांगितले. अनगोळ येथे सुद्धा त्यांचे एक दुकान आहे. मिठाई वितरित केली तरी चॉकलट्स विरघळण्याची भीती त्यांना आहे.
असे असले तरी देशाची सुरक्षितता महत्त्वाची. त्यामुळे झालेले नुकसान मोठे असले तरी ते मान्य केल्याशिवाय पर्याय नाही. कोरोनामुळे झालेल्या नुकसानीसमोर हे नुकसान सोसण्याची तयारी आहे. त्यामुळे सरकारने उचललेले पाऊन योग्य असून त्याला आपला पाठिंबा आहे, असे त्यांनी सांगितले.
दूधापासून केलेले सर्व पदार्थ नष्ट केले : चंद्रकांत सासणे
कोनवाळ गल्ली येथे यांचे स्वीट मार्ट आहे. मिठाई तयार करण्यासाठी घेतलेला खवा आणि दूध टाकून द्यावे लागले. दूधापासून केलेले सर्व पदार्थ नष्ट करावे लागले. 22 वर्षे दुकान चालवत आहे. प्रथमच असे नुकसान झाले आहे. परंतु ते सर्वांचेच झाले असल्याने आणि कोरोनापुढे त्याचे काही वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.
भाजी विक्रेत्यांना पदार्थांचे वाटप : हरीश रायका स्वीट्स
समादेवी गल्ली येथे यांचे दुकान आहे. आपल्या दुकानात हळदीरामचे पदार्थ अधिक आहेत. कर्फ्यू आणि लॉकडाऊननंतर आपण सर्व पदार्थ समादेवी गल्लीत बसणाऱया भाजी विक्रेत्यांना आणि इतरांना वाटून टाकले आहे. ज्या पदार्थांची एक्स्पायरी डेट अद्याप आहे. ते पदार्थ ठेवले आहेत. बाकी सर्व पदार्थ वितरित केले आहेत.
75 कामगारांचा पगार केला पाहिजे : विक्रम पुरोहित
बेळगावला कॅम्प येथे स्वीट मार्ट आहे. एकूण चार शाखा बेळगावला असून 1952 पासून हे दुकान चालवत आहेत. अर्थातच 75 हून अधिक कर्मचारी सेल्समन आहेत. या सर्वांचा पगार केला पाहिजे. तशी कामगार खात्याची सूचना तर आहेच. परंतु आपली पण जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
गोरगरिबांना मिठाई वाटप करणे पुण्याचे काम : राज के. पुरोहित
बेळगावला स्वीट मार्ट व्यवसाय उत्तम चालतो. परंतु सध्याची परिस्थितीच कठीण आहे. त्याच्याशी जळवून घेणे भाग आहे. सर्व पदार्थ वितरित केले आणि दुकाने बंद केली. कोणालाच या परिस्थितीत दोष देऊन चालणार नाही. आमचा व्यवसाय जीवनावश्यक या वर्गवारीत बसत नसल्याने सवलतीही मागता येत नाहीत. फक्त कोरोनाचे संकट टळू देत आणि दुकान लवकर सुरू होऊ दे एवढेच सांगणे शक्य आहे. यानिमित्ताने गोरगरिबांना मिठाई मिळाली. हे तरी पुण्याचे काम झाले.
हा वर्ग सधन असला तरी नुकसान त्यांचेही झालेच आहे. फक्त त्यामुळे त्यांचे आर्थिक वेळापत्रक कोलमडले असले तरी कामगारांचे नुकसान होऊ नये याची काळजी मात्र हा वर्ग घेणार आहे.