प्रतिनिधी/ पणजी
गोव्याच्या शेजारी असलेल्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ‘रात्रीची संचारबंदी’ (नाईट कर्फ्यु) लावण्यात आल्याने त्या दोन्ही राज्यांसह इतर अनेक राज्यांतील पर्यटकांनी गोव्याच्या दिशेने मोर्चा वळवला असून राज्यात नाताळसह नवीन वर्ष 2021 साजरे करण्यासाठी आताच गर्दी केली आहे. गोवा नाईट कर्फ्युपासून मुक्त असल्याने अनेक ठिकाणी, हॉटेल्समध्येही ‘नाईट पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख समुद्र किनारेही पर्यटकांनी फुलून गेले आहेत. धड मास्कही नाही आणि सामाजिक अंतरही नाही, अशी त्या गर्दीची अवस्था असल्याचे दिसून येत असून त्यावर पोलिसांचे, सरकारचे अजिबात नियंत्रण नाही.
नाताळ आणि नवीन वर्ष म्हणजे रात्रीच्या पाटर्य़ा असे समीकरण झाले असून महाराष्ट्र – कर्नाटकात त्या पाटर्य़ा करता येत नाहीत, म्हणून पर्यटकांनी गोव्याची वाट धरली आहे. गोव्यात त्या पर्यटकांना मोकळे रानच मिळाले असून त्यांनी मिळेल त्या ठिकाणी गर्दी केली आहे. सर्वजण कोरोना विसरले असून केवळ मौजमजा करण्यासाठी गोव्यात आले आहेत.
अनेक पर्यटकांकडून बेशिस्तीचे वर्तन
मौजमजा करण्यासाठी येणाऱया या पर्यटकांपैकी काहीजण नियम धाब्यावर बसवित असून बेशिस्त वागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे स्थानिक लोक व अशा बेशिस्त पर्यटकांमध्ये भांडणे होत असल्याच्याही तक्रारी आहेत. अशा बेशिस्त पर्यटकांमुळे चांगले पर्यटकही बदनाम होऊ शकतात. पुरेसे पदपथ असतानाही त्यावरुन न चालता पर्यटकांच्या झुंडी रस्त्यांवरुन फिरत असून वाहनांनी हॉर्न वाजविले तरी बाजूला होत नाहीत. स्वतः वाहन चालविणारे पर्यटक अती वेगाने वाहने चालवितात तसेच ‘वन वे’ नियम पाळत नसल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. जीवाचा गोवा करताना पर्यटकांनी शिस्त पाळावी, अशी अपेक्षा स्थानिक लोक व्यक्त करत आहेत.
कोरोना नियमांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष
या पर्यटकांच्या गर्दीमुळे गोव्यात सामाजिक अंतराचे पालन होते की नाही हे तपासणे शक्य नाही. त्यामुळे हा विषय सरकारने सोडून दिल्यात जमा आहे. फक्त वरचेवर कोरोनाचे नियम पाळा असे फक्त आवाहन करण्यात येते, परंतु त्याचे पालन होत नाही ही वस्तुस्थिती आहे. फक्त पणजी शहरात महापालिकेतर्फे मास्क न घालणाऱया पर्यटकांवर कारवाई होताना दिसते. इतर ठिकाणी मात्र कारवाई शून्य असे चित्र आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका
गोव्यात आलेल्या पर्यटकांमध्ये विदेशी पर्यटक नाहीत तर फक्त देशींचा भरणा आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्समधून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे, परंतु त्याची फिकीर कोणालाच नाही. देशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात गोव्यात आले असून बहुतके हॉटेल्स – गेस्ट हाऊस हाऊसफुल्ल झाली आहेत. कर्नाटक – महाराष्ट्र राज्यातील तसेच इतर राज्यातील अनेक वाहने गोव्यात दिसत असून पर्यटक आपापली वाहने घेऊन राज्यात आल्याचे दिसून येत आहे.
गोव्यात सध्या गर्दी झालेल्या पर्यटकांना आवर घालण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी राज्य सरकारकडे कोणतीच यंत्रणा नाही. गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर, मास्क, गेस्ट हाऊसवाले तसेच पर्यटक टॅक्सीवाले यांना व्यवसाय मिळाला आहे.
पाटर्य़ांसाठी एसओपी नसल्याने गर्दी वाढण्याची शक्यता
गोव्यात नाईट पार्टी आयोजनाबाबत कोणतीही एसओपी नाही तसेच येणाऱया – जाणाऱया पर्यटकांची तपासणी होत नाही. हे सर्व त्यांच्या पथ्यावर पडले असून त्यांनी गोव्यात एकच गर्दी केली आहे. आता वर्ष 2020 संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे राज्यातील पर्यटक आणखी वाढण्याची तसेच नाईट पार्टीचा धुमधडाका बहरण्याची चिन्हे आहेत. कोरोना असो किंवा नसो पर्यटकांना मात्र त्याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे गोव्यात चित्र आहे. हा सारा प्रकार कोरोना संसर्ग नियंत्रणात असलेल्या गोव्याच्या मुळावर येईल, अशी भीती स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.