अध्याय दहावा गुरु शिष्य लक्षण
या अध्यायात गुरु आणि शिष्य यांच्याबद्दल भगवंत उद्धवाला सविस्तर सांगत आहेत. प्रथम त्यांनी सद्गुरु महिमा सांगितला. ते पुढे म्हणाले, कोणताही लोभ न ठेवता वाटय़ाला आलेले कर्म कर म्हणजे तू ईश्वराचा लाडका होशील. सद्गुरु हे ईश्वराचे सगुण रूप असतात. त्यांचीही तू निरपेक्षतेने कर्म करत असल्याने तुझ्यावर कृपा होईल. नंतर उत्तम शिष्याची नऊ लक्षणे भगवंतांनी सांगितली. पुढे म्हणाले, बायका मुलांच्यात राहून निरपेक्षतेने कर्म करणे कसे शक्मय आहे ते मी तुला सांगतो. त्याविषयी लक्ष देऊन ऐक. शिष्य हा आपले दुःख नाहीसे करण्याकरिता आणि आत्मसुख मिळविण्याकरिता विवेकाची साधने साध्य करून घेत असतो. या साधनांच्या माध्यमातून काय चूक काय बरोबर याचा उलगडा होत राहतो. सुखाबद्दल म्हणशील तर कुटुंबातील प्रत्येकालाच ते हवे असते त्यामुळे सुखासाठीच सारे प्रपंचातील पदार्थाला झोंबत असतात. जेव्हा एकाच गोष्टीसाठी सगळे धडपडू लागतात तेव्हा ती पूर्णपणे कुणाच्याच हाताला लागत नाही. मी आणि सुख या दोन गोष्टी आहेत असे वाटू लागले की, द्वैत निर्माण होते आणि द्वैत म्हणून जितके आहे तितके निखालस दुःखमय असते आणि अद्वैतामध्येच परमसुख आहे. हे लक्षात घेतले की, सुख हे स्वतःतच आहे हे ज्ञान साधकाने संपादन केल्यामुळे बायका मुले, आप्त, इष्ट व संपत्ती यांच्याविषयी ते उदासीन असतात. नानाप्रकारची धनधान्याची समृद्धी असली, तरी ‘ती माझी’ व ‘देहही माझा’ असे तो म्हणत नाही. उद्धवा, याप्रमाणे माझे भक्त हे तत्त्वविचाराला धरून असल्याने घरादाराला आणि संसाराबाबत तटस्थ असतात. ते गुरुच्या चरणाला मिठी घालून प्रपंच बाजूला सारतात आणि आत्मसुख देणाऱया गुरुरायाच्या भजनात मोठय़ा भक्तिभावाने तत्पर होऊन राहतात. उद्धवा, आता तू अशी शंका काढशील की, ‘देह म्हणजे सुख मिळवण्याचे सर्वोत्तम साधन असा सर्वसाधारण समज असताना देहाशिवाय भिन्न अशी कोणती वस्तु पाहून त्याला सुख प्राप्त होते आणि मी देहापेक्षा वेगळा आहे असा विदेहपणाचा अनुभव कसा येतो?
देहात असून विदेहता आणि प्रपंचात असून अद्वैतता शिष्याच्या हाताला कशी लागते तेही ऐक. आत्मा हा स्थूल व सूक्ष्म देहाहून सदासर्वदा भिन्न आहे. खरं म्हणजे या दोन्ही देहामध्ये जीव वागत असताही त्या जीवांना आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा विचार स्फुरतच असतो. पण हे त्यांना समजत नाही. म्हणजे असे बघ, डोळा दुखायला लागला की, तो ‘माझा डोळा दुखू लागला’ असे म्हणतो, पण मीच दुखू लागलो असे म्हणत नाही. माझा पायच मोडला असे म्हणतो, पण मीच मोडलो असे म्हणत नाही. त्याप्रमाणे देहात वागत असताही मी देहाहून भिन्न आहे, असे प्रत्यक्ष सांगत असतो. पण माणसाला भ्रमामुळे आपली देहातीत अवस्था कळत नाही. आत्मा म्हणजे मन नव्हे. कारण अकरा इंद्रियांमध्ये मनालाही एक इंद्रिय असेच मानलेले आहे.
प्रपंचामध्ये मनाची दक्षता दिसून येते, पण ती खरोखर काही मनाची नव्हे. प्राणाशिवाय राजालाही कधी आपले वैभव दृष्टीस पडत नाही त्याप्रमाणे मनालाही आत्म्याशिवाय दक्षता बाळगता येत नाही. मन हे इंद्रिय असल्याने जड आहे. त्याला ज्ञानप्रभाच प्रकाशित करून श्रे÷त्व देते.
मुरलीमधून नानाप्रकारचे राग काढून दाखविले, तर तो काही त्या मुरलीचा गुण नव्हे, ते त्या वाजवणाऱयाचे कौशल्य होय. त्याप्रमाणे मनाचा व्यापार, ते एक इंद्रिय असल्याने परतंत्रच आहे असे तू समज. त्याचा तो व्यापार स्वतंत्र नसतो. सूर्याचे किरण लागले म्हणजे सूर्यकांतातून अग्नी निघतो, त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रकाशाने मन मोठय़ा वेगाने वागत असते. ‘माझे मन’ असे प्रत्यक्ष म्हणत असतो. पण ‘मीच मन’ असे काही म्हणत नाही. म्हणून मनापासून आत्मा हा भिन्नच आहे. तो वेगळेपणाने म्हणजे साक्षीरूपाने असतो.
भगवंत उद्धवाला आत्मा हा देहापेक्षा वेगळा कसा असतो हे समजावून सांगत आहेत ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची असून आपण ती पुढील भागात सविस्तर अभ्यासणार आहोत.
क्रमशः