केंद्र-राज्यांमधील विसंवादामुळे पहिल्याच दिवशी 80 उड्डाणे रद्द : प्रवाशांना फटका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘लॉकडाऊन’च्या चौथ्या टप्प्यात तब्बल दोन महिन्यानंतर सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली असली तरी नियोजनामधील गोंधळामुळे देशभरातील 80 हून अधिक विमाने रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. काही राज्यांनी विमानांच्या वाहतुकीवर काही प्रमाणात निर्बंध लावल्यामुळे उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती विमान वाहतूक प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, काही शहरांदरम्यान विमान वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधानाची भावना व्यक्त केल्याचेही दिसून आले.
सोमवारपासून देशांतर्गत विमान वाहतूक सेवा सुरू करण्याची घोषणा मागील आठवडय़ात करण्यात आली होती. त्यानंतर बऱयाच प्रवाशांनी विविध शहरांमध्ये जाण्यासाठी बुकिंगही केले होते. विमान प्रवाशांसाठी ही आनंदाची बाब असली तरी पहिल्याच दिवशी अनेक प्रवाशांना निराशेला सामोरे जावे लागले आहे. विमान प्रवासाचे नवे नियम आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटेपासून प्रवाशांनी विमानतळ गाठायला सुरुवात केली होती. मात्र तिथे गेल्यानंतर शेवटच्या क्षणी काही विमाने रद्द केल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यामुळे बऱयाच दिवसानंतर टेक ऑफ घेण्यासाठी सज्ज असलेल्या प्रवाशांच्या इच्छा-आकांक्षांवर विमानतळ प्रशासनाने पाणी सोडले. दिवसभरात 80 हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दिल्लीहून पोर्ट ब्लेअर, कोलकाता, हैदराबाद, मुंबई, इंदोर आदी ठिकाणी जाणारी पहाटेची विमाने रद्द झाली होती. दिल्लीप्रमाणेच मुंबई, कोलकाता, बेंगळूर येथेही काही विमाने रद्द करण्यात आली. आसाममधील गुवाहाटी विमानतळावरही अशीच परिस्थिती असल्यामुळे प्रवाशांना ताटकळत अनेक तास बसावे लागले.
निम्म्या उड्डाणांवर परिणाम
नागरी वाहतूक मंत्रालयाने नियोजन करताना वेगवेगळय़ा शहरांमध्ये 190 उड्डाणे आणि लँडिंगचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र दिवसभरात केवळ 100 च्या आसपास विमानांनी उड्डाण केल्याची नोंद झाली आहे. काही ठिकाणी प्रवासी कमी असल्यामुळेही विमाने रद्द करावी लागली. दिल्ली विमानतळावरुन उड्डाण घेणारी 82 विमाने रद्द करण्यात आली होती. देशभरातील विविध विमानतळांवर प्रवाशी आपल्या विमानाची वाट पाहत असल्याचे चित्र दिसून येत होते.
प्रवाशांचा संताप
माझे विमान ऑनलाईनवर वेळेवर दाखवत होते. एजंटनेही विमान 11 वाजता टेक ऑफ घेणार असल्याचे सांगितले. मात्र विमानतळावर पोहोचल्यानंतर विमान रद्द केल्याचे समजले. यासंबंधीची माहिती आधीच समजली असती तर मी विमानतळावर आलोच नसतो, असे सांगत एका प्रवाशाने संताप व्यक्त केला. परवड झालेल्या अन्य प्रवाशांनीही विमानतळ प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.