पॅरिस / वृत्तसंस्था
द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि इतर सहकार्यासंबंधी भारताने बुधवारी सिंगापूरशी पॅरीसमध्ये चर्चा केली आहे. भारताचे विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी पॅरिसमध्ये सिंगापूरचे विदेश मंत्री व्हिव्हियन बालकृष्णन यांच्याशी बोलणी केली. हे दोन्ही नेते पॅरीसमध्ये होत असलेल्या भारत-प्रशांत महासागरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी येथे आले आहेत. ही बैठक या संबंधातील युरोपियन महासंघाच्या मंत्रीगटाने आयोजित केली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
भारताच्या संसदेत बहुसंख्य खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, अशी टीका सिंगापूरच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी केली होती. भारताने याची गंभीर दखल घेऊन सिंगापूरला तीव्र शब्दांमध्ये समज दिली होती. या पार्श्वभूमीवर पॅरीसमध्ये या दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक झाली. मात्र, चर्चेच्या वेळी कोणतीही कटुता राहिल्याचे दिसून आले नाही. चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचे सांगण्यात आले. सिंगापूर हा भारताचा प्रदीर्घ काळापासून आर्थिक सहकारी आहे.