प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात धर्मांतरविरोधी कायद्यास विरोध होत आहे. तर हा कायदा मंजूर करावा अशी मागणी विविध हिंदू संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे. विधानसभेत हा कायदा मंजूर करावा, या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्यावतीने सोमवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
फौंड्री क्लस्टर सभागृहात विश्व हिंदू परिषदेच्यावतीने विविध मठाधीश, पीठ आणि हिंदू संघटनांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी राज्यात धर्मांतर विरोधी कायदा मंजूर करावा, अशा मागणीचे निवेदन विविध मठाधीशांच्यावतीने देण्यात आले. धर्मांतर देशाच्या अखंडतेला, ऐक्मयाला आणि सद्भावनेला धोका निर्माण करत आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व धर्मात राहून करण्यात येत असलेले धर्मांतर रोखण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर उपाय करावेत, अशी मागणी हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी केली.
सध्या धर्मांतर विरोधी कायदा काळाची गरज असून, गरजू आणि गरिबांना हेरून त्यांना धर्मांतर करण्यासाठी भाग पाडण्यात येत आहे. त्यामुळे हा कायदा मंजूर करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत नक्कीच चर्चा करून धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन निवेदन स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी दिले.