वार्ताहर / हुबळी
राज्यातील इतर जिल्हय़ांपेक्षा धारवाड जिल्हय़ात कडक लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. अनेक संघटनांनी लॉकडाऊन नियमातून आपल्याला सूट द्यावी, अशी विनंती केली आहे. प्रामुख्याने हॉटेल मालक संघटनेने आपल्याला निवेदन दिले असून पार्सल सेवेसाठी मुभा द्यावी, अशी विनंती केली आहे. हॉटेल्सवर अवलंबून असणाऱयांची संख्याही अधिक आहे. याबाबत आपण जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत सूचना करणार आहे, अशी माहिती मंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुसऱयांदा सत्तेवर आलेल्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हुबळीच्या केशवापूर येथील मयुरी कॉलनीतील उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम आणि फूड किट वितरण कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. शेतकऱयांनाही अनुकूल व्हावे यासाठी दुपारी 12 पर्यंत कृषी आणि कृषीपूरक आस्थापने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एपीएमसी सदस्यांनी बाहेरुन येणाऱया ट्रकमधील माल अनलोड करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे शेट्टर यांनी सांगितले.
याप्रसंगी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, रेमडेसिवीर खुल्या बाजारातून खरेदीसाठी असणारे प्रतिबंध हटविण्यात आले आहेत. दोन-तीन दिवसांत ब्लॅक फंगसवरील इंजेक्शन देखील सर्व रुग्णांना उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. आगामी काळात येणाऱया सर्व आव्हानांना तोंड देऊन जनतेच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार कामे करणार आहे, असेही प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.