आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांची माहिती : लस घेतल्यानंतरही खबरदारी घेण्याच्या बाबतीत दुर्लक्ष नको
प्रतिनिधी / बेंगळूर
सर्वांना शक्य तितक्या लवकर कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. यामुळे कोरोनाची पुढील लाट रोखता येऊ शकते. तोपर्यंत सर्वांना कोरोना सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन आरोग्य-कुटुंब कल्याणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले आहे.
येथे पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण अभियानावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शक्य तितक्या लवकर सर्वांना लस देण्यात येईल. मुलांना देखील लस देण्यात येणार आहे. केंद्राकडून मुलांवर लस देण्याची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. वृद्ध, युवा वर्ग, अधिक लोकांच्या संपर्कात येणाऱयांनाही लस देण्यात येत आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी कोरोनाचा नायनाट होईपर्यंत कोविड सुरक्षा नियमांचे पालन केलेच पाहिजे. आणखी 6 महिने किंवा वर्षभर मास्कचा वापर आणि इतर खबरदारी घेण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.
लॉकडाऊनमुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. याची जनतेलाही जाणीव आहे. पॉझिटिव्हीटी दर 47 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आला आहे. अनेक राज्यांमध्ये हा दर 8 ते 9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे कोविड तांत्रिक सल्लागार समितीचा सल्ला घेऊनच मुख्यमंत्री लॉकडाऊन वाढविण्याबाबत निर्णय घेणार आहेत, असेही मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.
ब्लॅक फंगसचे 35 रुग्ण दगावले
राज्यात ब्लॅक फंगसची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा 1,250 वर पोहोचला आहे. 30 ते 35 रुग्ण दगावले आहेत. यासंबंधी स्पष्ट माहिती मिळविण्यासाठी डेथ ऑडिट करण्याची सूचना आरोग्य खात्यातील अधिकाऱयांना दिली आहे. ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांवर सरकारी इस्पिळांमध्ये मोफत उपचार केले जात आहेत. खासगी इस्पितळांमध्ये उपचाराचे दर अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यात ब्लॅक फंगसची लागण झालेल्यांचा आकडा सातत्याने वाढतच असून त्यांच्यासमोर उपचाराचे मोठे आव्हान आरोग्य खात्यासमोर आहे. या रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणारे ऍम्फोटेरिसिन-बी हे इंजेक्शन पुरेशा प्रमाणात मिळवून देण्यासाठी केंद्रीयमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा प्रयत्नशील आहेत. यासाठी आठहून अधिक औषधनिर्मिती कंपन्यांशी चर्चा करण्यात आली आहे. देशभरात 80 हजार वायल्स विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. राज्याला 8 ते 10 हजार वायल्स पुरवठा झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
1,250 रुग्णांपैकी केवळ 18 जण बरे झाले
आरोग्य खात्याने ब्लॅक फंगससंबंधीची आकडेवारी रविवारी रात्री प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात सध्या ब्लॅक फंगसचे एकूण 1,250 रुग्ण आहेत. त्यामध्ये सर्वाधिक बेंगळूर शहर जिल्हय़ात 521 प्रकरणांची नोंद झाली आहे. तर धारवाडमध्ये 119, गुलबर्गा जिल्हय़ात 102, बागलकोट 68, विजापूर 57, कोलार 42, शिमोगा 38, रायचूर 36, बेळगाव आणि म्हैसूरमध्ये ब्लॅक फंगसचे प्रत्येकी 35 रुग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांपैकी 18 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. उर्वरित 1,193 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.