सुळेभावी लक्ष्मी देवीचा महिमा सांगणारी चाळीस गीते पुस्तकरुपात प्रसिद्ध
मनीषा सुभेदार/ बेळगाव
महिलांना मंदिराच्या गाभाऱयात प्रवेश द्यावा की नाही? महिलांना पूजाअर्चा, होमहवन करण्याचा अधिकार असावा का? महिलांचा पुराणशास्त्र यांचा अभ्यास आहे का? अशा चर्चा सातत्याने घडत असतात. तथापि अशा कोणत्याही चर्चेत न अडकता शांतपणाने सर्व धार्मिक विधींचे पौरोहित्य करणाऱया आपल्या आजच्या दुर्गा आहेत भारती ईश्वर कुडचीमठ. सुळेभावी येथील लक्ष्मी मंदिरात भारती यांचा विवाह झाला. या देवीवर त्यांची अपार श्रद्धा असून देवीचा महिमा सांगणारी चाळीस गीते त्यांनी पुस्तकरुपात प्रसिद्ध केली आहेत.
बेळगाव शहरात व बहुधा जिल्हय़ामध्येही त्या एकमेव महिला पुरोहित आहेत. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रवास ध्यानिमनी नसताना सुरू झाला. आज बेळगावमध्ये अनेक समाजांमध्ये डोहाळ जेवणापासून लग्न समारंभापर्यंतच्या सर्व विधींसाठी तसेच वास्तुशांती, होमहवन व अन्य धार्मिक विधींसाठी त्यांना निमंत्रित केले जाते.
भारती यांचे मूळ गाव कादरोळी, बायक्का व दुंडय्या हिरेमठ यांच्या त्या कन्या तर अन्नपूर्णा व राचय्या कुडचीमठ यांच्या त्या स्नुषा आहेत. त्यांच्या माहेरी आणि सासरी मठाची परंपरा आहे. त्यांचे आजोबा अप्पय्या शिवयोगी हे मठाधीश होते. कादरोळी येथे गणेशोत्सव व संक्रांत या दोन सणावेळी तेथे भव्य अशी यात्रा भरते. मठामध्ये मुलांसाठी पाठशाळा, वेधशाळा चालविली जाते. त्यामुळे भारती यांना शास्त्राची बरीचशी माहिती होती. दहावीनंतर त्यांचे ईश्वर कुडचीमठ यांच्याशी लग्न झाले. पतीचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता. प्रियश्री व निरंजनमहाराज अशी दोन मुले त्यांना आहेत. लग्नानंतर त्यांनी बी. ए. ची पदवी घेतली.
घरमालकावर केले अंत्यसंस्कार
दरम्यान त्या ज्या घरात भाडे देऊन रहात होत्या त्या घरमालकाचे निधन झाले. आणि अंत्यसंस्कार करण्यास कोणीही उपलब्ध झाले नाहीत. तेव्हा काही जणांनी तुम्हाला सर्व विधी माहीत आहेत, त्यामुळे तुम्ही ते करावेत अशी विनंती केली. भारती यांनी आपले वडील, सासरे व एका शास्त्रींशी चर्चा केली. त्यावेळी तुला भय वाटत नसेल तर तू जरूर हा विधी कर, असे त्यांना सांगण्यात आले. आणि त्यांनी हा विधी पार पाडला. दरम्यान पतीच्या व्यवसायामध्ये नुकसान झाले आणि त्याचवेळी भारती यांनी पूजापाठ, वचनसाहित्य सांगणे, पौरोहित्य करणे हे काम सुरू केले.
तुम्ही विरोध करणारे कोण?
हळुहळू विविध समाजातील लोक त्यांना बोलावू लागले. मेणसी गल्ली येथील हनुमान मंदिरात पूजा करण्यास तेथील लोकांनी विरोध केला तेव्हा हनुमानाच्या छातीमध्येच राम-सीता आहेत. तुम्ही विरोध करणारे कोण? असा प्रश्न त्यांनी केला. तेथे बराच वादविवाद झाला. तेव्हा भारती यांनी गार्गी मैत्रेयी यांचा दाखला दिला आणि लोकांचे समाधान होऊन पूजा करण्याचा मान त्यांना मिळाला. आज मंदिरासह पांगुळ गल्लीतील मारवाडी समाजाचे मंदिर, खासबाग येथील श्रीयादेवी मंदिराची पूजा भारती यांच्याकडेच आहे. त्यांचे पती ईश्वर हे सुद्धा वधू-वर मंडळ चालवितात. तसेच पूजापाठ करतात.
शास्त्रपुराणांचा अभ्यास असल्याने आज त्या रूद्रहोम, गणहोम, चंडिका होम, मृत्युंजय होम, नवग्रह होम, श्रीसुक्त, पुरुष सुक्त, वास्तुशांती, लग्नविधी, डोहाळ जेवण असे सर्व विधी शास्त्राsक्त पद्धतीने करतात. म्हणूनच मारवाडी, जैन, कुंभार, विश्वकर्मा, रजपूत, लिंगायत असा समाज भारती यांनाच विविध धार्मिक विधीसाठी बोलावतो. राजस्थानी व मारवाडी समाजांच्या पूजेवेळी त्या संस्कृतमध्ये मंत्र म्हणतात व हिंदीमध्ये त्याचा अर्थ सांगतात.
महिलांना पौरोहित्याचा अधिकार आहे का? या प्रश्नावर देव-देवतांनीच महिलांना पौरोहित्यासाठी मान्यता दिली असताना तुम्ही नाकारणारे कोण? असा प्रश्न त्या करतात. महिलांच्या ऋतुचक्राचे कारण दाखवून त्यांना नाकारले जाते. परंतु त्यामुळेच स्त्री पुढील पिढय़ांना जन्म देते. ती जगत् जननी आहे, देवांचीही ती माता आहे. हे समाजाने लक्षात घ्यावे, असे त्या म्हणाल्या.
नवरात्रीचे महत्त्व
नवरात्रीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखीत केले. त्या म्हणाल्या, देवीचे तीन महत्त्वाचे अवतार आहेत. ते म्हणजे ‘कर्मकांड, उपासना कांड व ज्ञानकांड’ होय. कर्मकांडामध्ये देवीचा उगम कसा झाला, त्रिमूर्ती कशा अवतरल्या याची माहिती आहे. उपासना कांडामध्ये देवीची आराधना आणि अनुग्रह याबद्दल उल्लेख असून तिसऱया कांडामध्ये तुझ्यामध्ये (मनुष्यामध्ये) देव आहे, तो जागृत करा देवीच्या साक्षात्काराची अनुभुती, घ्या असा उल्लेख आहे. अशी माहिती देतानाच आज देवीसमोर कोणतेही नृत्य केले जाते. परंतु देवीच्या साक्षात्काराची अनुभूती येईल, तिचा अनुग्रह मिळेल असे नृत्य केले पाहिजे, असे त्या सांगतात.
आजच्या महिलांनी विभक्त कुटुंबाऐवजी एकत्र कुटुंबाचा आग्रह धरला पाहिजे. विभक्त कुटुंबांमुळे माणसे एकाकी पडत आहेत. किमान महिलांनी तरी परस्परांना जोडून घेत रहायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भक्तीभाव हवा, अवडंबर नको
पूर्वी समाजामध्ये धार्मिकता होती. साध्या कलशावर नारळ ठेवून देवीस्वरूप म्हणून पाहिले जात असे. तिची पूजा होत असे. आज सजावट, अलंकार यांना महत्त्व आले आहे. ते जरूर असावे परंतु त्याचे अवडंबर करणे योग्य नाही. देव-धर्म मानणे किंवा न मानणे, हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक विषय आहे. परंतु जर धर्मानुसार आचरण करत असू तर मनातील भाव आणि भक्ती महत्त्वाची आहे. त्यातून माणुसकी जपली गेली पाहिजे. जात, पात व अन्य भेदांना टाळले पाहिजे. असे त्या सांगतात.
निर्भयपणे स्मशानभूमीत विधी पूर्ण करतात
जेव्हा घरमालकाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तेव्हा भारती यांची बीए ची परीक्षा सुरू होती. त्यांनी प्रारंभीचे विधी घरी पूर्ण केले व परीक्षा देऊन नंतर स्मशानभूमीमध्ये जाऊन तेथील विधी पूर्ण केले. आज त्या भक्ती भावनेने मंदिरात जातात तर निर्भयपणाने स्मशानभूमीत जाऊन विधी पूर्ण करतात.
भारती यांच्या पौरोहित्याची अनेक मठाधीशांकडून प्रशंसा
भारती यांच्या पौरोहित्याची अनेक मठाधीशांनी प्रशंसा केली आहे. काशी येथील जगद्गुरुंनी त्यांचा सन्मान केला आहे. चंद्रशेखर महास्वामींनी स्वत: लिहिलेले ‘सिद्धांत सिखामणी’ हे पुस्तक देऊन सत्कार केला आहे. तुमकुरच्या सिद्धगंगा शिवयोगी स्वामींनी त्यांना निमंत्रण देऊन सन्मानित केले आहे. हुक्केरी अज्जा, कारंजीमठाच्या स्वामींनीही त्यांचा सत्कार केला आहे.