पुरुलियामध्ये ममता बॅनर्जी यांचे विधान
वृत्तसंस्था / पुरुलिया
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक नजीक आल्याने राजकीय पक्षांमधील वाप्युद्ध पेटू लागले आहे. पुरुलिया येथे सभेकरता मंगळवारी पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. भाजप नक्षलवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपमध्ये जाऊ पाहणारे नेते तृणमूल काँग्रेस सोडू शकतात, परंतु मी माझे शीर भाजपसमोर झुकविणार नाही. एखादा व्यक्ती कपडे दररोज बदलू शकतो, पण विचारसरणी बदलता येत नसल्याचे ममता म्हणाल्या.
मागील काही काळात तृणमूलचे अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यात सर्वात प्रमुख नाव शुभेंदु अधिकारी यांचे आहे. अधिकारी यांच्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा ममतांनी केली आहे. तर अधिकारी यांनीही ममतांचे आव्हान स्वीकारत त्यांना 50 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभूत न केल्यास राजकारणातून संन्यास घेणार असल्याची घोषणा केली आहे.
विरोधकांना भयभीत करण्यासाठी भाजप आयटी शाखेचा वापर करत आहे. भाजप नक्षलवाद्यांपेक्षाही अधिक धोकादायक असल्याचा आरोप ममतांनी केला आहे. आमच्या सभांमध्ये गोंधळ घालण्यासाठी भाजपकडून काही लोकांना पाठविले जात असल्याचे दिसून आले आहे. आम्ही देखील आता भाजप आणि माकपच्या बैठका उधळून लावण्यासाठी माणसे पाठविणार आहोत. मतासाठी कुणी पैसे देत असल्यास ते घ्या असे ममतांनी लोकांना उद्देशून म्हटले आहे.