वृत्तसंस्था / अमृतसर
पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धूने कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जाहीरपणे आव्हान दिले आहे. कॅप्टन अमरिंदर यांनी अमृतसर पूर्वमधून सिद्धू यांच्या विरोधात निवडणूक लढवावी, त्यांना सिद्धू आणि त्यांची लोकप्रियता उमगेल. कॅप्टन अमरिंदर यांच्या कार्यकर्त्यांच्या वास्तव्यापासून जेवणापर्यंतची व्यवस्था आम्ही करू असे नवज्योत यांनी म्हटले आहे. अमरिंदर सिंह यांनी पुढील निवडणुकीत सिद्धू यांना जिंकू न देण्याचे विधान केले होते.
नवज्योत सिद्धू यांना देशविरोधी म्हटले गेल्याप्रकरणीही नवज्योत कौर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देशविरोधी असते तर सिद्धू देशासाठी खेळले नसते. क्रिकेटपटू म्हणून ते पाकिस्तानात गेले आणि योगायोगाने कर्तारपूर कॉरिडॉर खुला होण्याचा मार्ग तयार झाला. सिद्धूंना तेथे मिळालेला सन्मान कॅप्टन अमरिंदर यांना सहन झाला नाही. पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवण्यासाठी पाकिस्तानीला घरात ठेवणे अधिक धोकादायक असल्याचे नवज्योत कौर म्हणाल्या. पाकिस्तानी महिला पत्रकार अरुसा आलम आणि अमरिंदर यांच्या मैत्रीवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
अकाली दलालाही अशक्य
अकाली दलाने देखील सिद्धू यांना संपविण्याचा प्रयत्न केला, पण यशस्वी झाले नाहीत. अकाली दलाने सिद्धू यांची उमेदवारी रद्द करवून घेत अरुण जेटली यांना अमृतसरमधून निवडणूक लढवायला लावली. अमृतसरच्या लोकांनी सिद्धू यांच्यावर झालेल्या अन्यायाचा सूड उगविला आणि जेटली निवडणुकीत पराभूत झाल्याचे नवज्योत यांनी म्हटले आहे.
काँग्रेसमध्ये कलह नाही
पंजाब काँग्रेसमध्ये सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यात कुठलाच कलह नाही, केवळ पंजाबच्या भल्यासाठी चर्चा होत आहे. सर्वांचे उद्दिष्ट पंजाबचा विकास घडवून आणणे हाच आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केला जातोय असे त्या म्हणाल्या.