राजौरी विभागात सेनेची कारवाई, आणखी 4 दहशतवाद्यांना घेरले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात भारतीय सैनिकांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना असणाऱया लष्कर ए तोयबाच्या सहा दहशतवाद्यांना ठार केले आहे. येथे मंगळवारी रात्री उशीरापर्यंत चकमक सुरु होती. आणखी चार ते पाच दहशतवाद्यांना घेरण्यात आले असून त्यांचा मृत्यू अटळ असल्याचे मानले जाते.
काही दिवसांपूर्वी याच विभागात भारतीय सेनेचे 9 सैनिक हुतात्मा झाले होते. त्यामुळे या भागात सैनिकांची संख्या वाढविण्यात आली होती. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात आणखी 10 ते 12 दहशतवादी दडून बसल्याचे कळताच मंगळवारी सकाळपासून त्यांना घेरण्यात आले. यावेळी भारतीय सैनिकांनी नवे तंत्र उपयोगात आणले होते. दहशतवाद्यांवर स्वतः हल्ला करण्याऐवजी ते बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे धोरण आखण्यात आले होते. त्यानुसार दहशतवादी त्यांच्या लपण्याच्या जागेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. त्या सहा जणांचा खात्मा करण्यात आला.
दहशतवाद्यांचे तंत्र
काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी भारतीय सेनेचे 9 सैनिक मारले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी दोन किंवा तीनचे गट करुन एकाचवेळी विविध दिशांनी सैनिकांवर हल्ला केला होता. परिणामी, सैनिकांचे लक्ष विचलित झाल्याने मोठी जीवीत हानी सेनेला सोसावी लागली होती. म्हणून यावेळी नवे तंत्र उपयोगात आणून दहशतवाद्यांची कोंडी करण्यात आली होती. कोंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी दहशतवादी त्यांच्या जागांमधून बाहेर येताच त्यांना टिपण्यात आले.
दहशतवाद्यांची घुसखोरी
गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये जम्मू भागात दहशतवाद्यांच्या काही टोळय़ांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचरांनी दिली होती. या टोळय़ांमध्ये एकंदर 18 ते 20 दहशतवादी असावेत असे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. पूंछ जिल्हय़ाच्या सीमावर्ती वनमय प्रदेशातून ही घुसखोरी झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र यापैकी अनेक दहशतवाद्यांना त्यांनी सीमा ओलांडताच ठार करण्यात आले.
अफगाणिस्तानातील घटना
अफगाणिस्तानात झालेल्या सत्तांतरामुळे पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संघटनांचा उत्साह वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांनी भारतात घुसून नव्याने उच्छाद मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे. अफगाणिस्तानातील घटनांचा परिणाम भारतातील स्थितीवरही होणार याची कल्पना आपल्या धोरणकर्त्यांना आधीपासूनच होती. त्यामुळे सीमावर्ती भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. यापुढे अशीच दक्षता बाळगण्यात येणार आहे.
सुरक्षा प्रमुख बिपिन राय यांची बैठक
भारताचे 9 सैनिक हुतात्मा झाल्यानंतर संरक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी बिपिन राय यांनी 16 ऑक्टोबरला राजौरी प्रदेशाला भेट दिली होती. तसेच दहशतवाद्यांचा निःपात करण्यासाठी कमांडर्ससह चर्चा करुन धोरण आखले होते, अशी माहिती आहे. त्याच बैठकीत थांबा आणि वाट पहा हे तंत्र ठरविण्यात आले.