चिपळूण-परशुराममधील संगिता निकम यांनी शोधली नवी वाट
प्रतिनिधी / चिपळूण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाकडाऊन जाहीर झाल्यानंतर तालुक्यात प्रथम गावबंदी झाली ती परशुराममध्ये सारेच ठप्प झाले. पतीची नोकरीही थांबली. मात्र, अशाही परिस्थितीत परशुराम येथील संगिता संजय निकम यांनी नवी उमेद बाळगली. स्वत:चे पूर्वांपार सुरू असलेले शिवणकामही थांबले असताना त्यांनी भाजी व्यवसायाच्या माध्यमातून नव्या संधीची कवाडे उघडली आणि त्यात यशही मिळवले.
कोरोना महामारीने जशी वाताहात झाली, तसेच अनेकांना जगायलाही शिकवले. पारंपरिक व्यवसाय नेस्तनाबूत झाल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न पडल्यानंतर अवसान गाळून काहीजण बसले. पण काहीजणांनी सकारात्मकता दाखवत रोजगाराच्या नव्या वाटाही शोधल्या. कोरोना लाकडाऊन जाहीर झाल्यानंतर परशुराम ग्रामस्थांनी गावबंदी जाहीर केली. रस्ते बंद करून ग्रामपंचायतीने गावातील कोणालाही बाहेर जाण्यास बंदी केली व बाहेरूनही कोणाला गावात येण्यास मज्जाव केला.
एकमेकांना धीर देत आणि प्रत्येकाच्या अडी अडचणीला समोर जात ग्रामस्थांनी एकमेकांना काहीही कमी पडू दिले नाही. मात्र गावची लोकसंख्याही सुमारे साडेतीन हजाराहून अधिक असल्याने गावच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन त्या दृष्टीने गावात भाजीचा व्यवसाय कुणीतरी सुरू करावा, असे सूचवण्यात आले. गावातीलच सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी आपली बहीण संगिताला ‘ताई गावातील लोकांना भाजीपाला मिळत नसल्याने हाल होत आहेत. आपल्याला काहीतरी केले पाहिजे’ असे सांगत ‘तू भाजी व्यवसाय सुरू कर’ असे सूचवले.
सुरूवातीला मनात थोडी चलबिचल झाली. तसे पाहिले तर निकम यांचा शिवणकाम व्यवसाय. मात्र कोरोना महामारीमुळे या व्यवसायावरही गदा आली होती. त्यातच कंपन्या बंद असल्याने पतीही घरीच असल्याने घरचा चरितार्थ चालवण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी होकार दिल्यानंतर बंधू पाटील यांनीच सुरूवातीच्या काळात त्यांना पाटण, कराड येथून भाजी आणून देण्यास सुरूवात केली. चिपळूण बाजारपेठेतील दरापेक्षा कमी दरात त्यांनी भाजी विक्री करण्यास सुरूवात केली. लाŸकडाऊन असतानाही ग्रामस्थांना भाजी मिळत गेली आणि त्यातूनच मग निकम यांचे कुटुंब सावरत गेले. विशेष म्हणजे ग्रामपंचायत, ग्रामस्थ या सर्वांनीच त्यांना पुरेपूर सहकार्य केले. त्यातूनच मग गेल्या 6 महिन्यांपासून निकम यांचा भाजीचा व्यवसाय बहरत गेला.
निकम कुटुंबिय मुळचे इस्लामपूरमधील लाडेगावचे. त्यांचे सासरे पोफळीला शिक्षक होते. त्यामुळे पुढे हे कुटुंबिय येथेच स्थायिक झाले. मध्यंतरी हे कुटुंब पुन्हा इस्लामपूरला गेले. मात्र 2005मध्ये पुन्हा इस्लामपूरहून परशुरामचा प्रवास झाला. पती संजय हे लोटे येथील एका कंपनीत काम करतात. संगिता या लहान-लहान उद्योग करून कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळतात. त्यांनी कोरोना महामारीत सुरू केलेला भाजी व्यवसाय त्यांच्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी नवा पर्याय ठरला.