प्रवाशांची खासगी वाहनांवरच भिस्त : बेळगाव विभागाला दररोज 60 लाखांचा तोटा
प्रतिनिधी / बेळगाव
मागील नऊ दिवसांपासून परिवहनच्या कर्मचाऱयांनी पुकारलेला संप अद्याप मागे घेतला नाही. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत आहे. शिवाय शनिवारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र, बससेवा सुरळीत न झाल्याने परिवहन मंडळासमोर अडचणी वाढल्या आहेत.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतन देण्याची मागणी करून परिवहन कर्मचाऱयांनी पुकारलेला संप सुरूच आहे. त्यामुळे परिवहनची बससेवा अद्याप सुरळीत झाली नाही. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. नोकरदार, कामगारवर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिवहनचे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारनेही तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे परिवहनच्या कर्मचाऱयांचा तिढा अद्याप सुटला नाही. लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान होणार आहे. याकरिता निवडणूक अधिकारी व ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात पोहोचविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात बसेसची गरज असते. मात्र, गुरुवारपर्यंत परिवहनचे कर्मचारी बससेवेत हजर न झाल्याने परिवहनसमोर अडचणी वाढल्या आहेत.
बेळगाव बसस्थानकातून गुरुवारी विविध मार्गांवर 45 हून अधिक बस धावल्या. धारवाड, हुबळी, बागलकोट, चिकोडी, निपाणी, खानापूर, बैलहोंगल आदी भागाकडे बस धावल्या. मात्र, बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, परिवहनने खासगी वाहनांना आगारात आणून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे काही भागात खासगी वाहने धावत असली तरी काही भागात वाहने नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
परिवहनचे कर्मचारी सहावा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नऊ दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाचे दररोज कोटय़वधीचे नुकसान होत आहे. गेल्या आठ दिवसांत परिवहनला 152 कोटींचा फटका बसला आहे. बेळगाव विभागाला दररोज 60 लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन अडचणीत आले आहे.